प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनामुळे देशभर 25 मार्चपासून टाळेबंदी जाहीर करण्यात आल्याने अनेक सहली रद्द झाल्या आहेत. मात्र सहलींसाठी आगाऊ नोंदणी केलेल्या ग्राहकांना परतावा देण्यात यात्रा कंपन्या चालढकल करत आहेत. या पार्श्वभुमीवर मुंबई ग्राहक पंचायतने ऑनलाईन सर्वेक्षण हाती घेतले असून ते 15 ते 24 जून या कालावधीत ते केले जाणार आहे. यातील निष्कर्षानंतर ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्राहक पंचायत पुढाकार घेणार आहे.
टाळेबंदीमुळे देशातील आणि परदेशात जाणारी हवाई सेवासुद्धा ठप्प झाली. 25 मार्चनंतर देशांतर्गत वा विदेशी पर्यटन सहलींसाठी ज्या प्रवाशांनी आरक्षण केले होते त्या प्रवाशांना साहजिकच या सहली रद्द झाल्यामुळे आपल्या रकमेचा परतावा मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु बऱयाच सहल कंपन्यांनी सरकारी आदेशामुळे सहली रद्द कराव्या लागल्याचे कारण पुढे करत प्रवाशांना परतावा नाकारला आहे. काही कंपन्यांनी या रकमेच्या परताव्या ऐवजी क्रेडिट कुपन प्रवाशांना देऊ केले असुन हे कुपन ते येत्या 6 ते 12 महिन्यांत त्यांच्या सहलींसाठी वापरु शकतील असे कळवले आहे. परंतु त्यातही काही रक्कम कापून घ्यायचे या कंपन्यांनी परस्पर ठरवल्याचे कळते.
याबाबत मुंबई ग्राहक पंचायतीने एक ऑन-लाईन सर्वेक्षण हाती घेतले आहे. ज्या पर्यटकांच्या देशांतर्गत वा परदेश सहली टाळेबंदी मुळे रद्द झालेल्या असतील त्यांना सहल कंपन्या पैसे परत करत आहेत किंवा अन्य काही पर्याय पर्यटकांना देत आहेत, तसेच हे करताना त्यातुन काही रक्कम कापून घेत आहेत का याबाबतची माहिती या सर्वेक्षणातून मागवली आहे.
सर्वेक्षणातून मिळाणाऱया माहितीच्या आधारे संबंधित सरकारी यंत्रणेकडे ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने सर्व पर्यटन कंपन्यांना मार्गदर्शक सुचना द्याव्यात यासाठी मुंबई ग्राहक पंचायत आग्रह धरणार आहे. हे सर्वेक्षण सोमवार, 15 जूनला सुरु होत असून बुधवार 24 जून सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑन-लाईन उपलब्ध असेल. तरी सर्व संबंधित ग्राहकांनी या सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन मुंबई ग्राहक पंचायतीने केले आहे. मुंबई ग्राहक पंचायतीच्या mymgp.org या संकेतस्थळावर जाऊन सर्वेक्षणाची प्रश्नावली भरावी. असे आवाहन मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी केले आहे.