जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल आणि शेतकऱयांनी घेतली भेट
प्रतिनिधी / बेळगाव
नियोजित बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गामध्ये अत्यंत सुपीक जमीन जाणार आहे. त्यामुळे शेतकऱयांना मोठा फटका बसणार असून देसूर ते के. के. कोप्प या नवीन रेल्वेमार्गाच्या पर्यायाचा विचार करावा, अशी मागणी नंदिहळ्ळी, प्रभूनगर, गर्लगुंजी, नागेनट्टी या परिसरातील शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
केंद्रिय रेल्वेराज्य मंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांनी बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गासाठी प्रयत्न केले. त्याला यशही आले. मात्र रेल्वेमार्गामध्ये सुपीक जमीन जात असून त्या ऐवजी देसूर ते के. के. कोप्प असा मार्ग केला तर तो मार्ग खडकाळ जमीनीतून जाणार आहे. तेंव्हा त्याचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
महत्वाचे म्हणजे या रेल्वेमार्गामुळे जवळपास 6 कि.मी. अंतर कमी होणार आहे. याचबरोबर 209 कोटी रुपये सरकारचे वाचणार आहेत. तेंव्हा याचा विचार होणे गरजेचे आहे. नंदिहळ्ळी परिसरातील शेतकऱयांची जमीन ही अत्यंत सुपीक आहे. या जमीनीमधून तीन पिके शेतकरी घेत असतात. त्याच जमिनीमधून हा रस्ता जात आहे. जवळपास यामध्ये 80 टक्के जमीन सुपीक आहे. मात्र दुसऱया ठिकाणाहून हा रेल्वे मार्ग केल्यास शेतकऱयांच्या सुपीक जमीनी जाणार नाहीत, असे या निवेदनात म्हटले आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी योग्य तो पाठपुरावा करु, असे आश्वासन दिले आहे. जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, परशराम कोलकार, लक्ष्मण जाधव, मारुती मेलगे, आर. व्ही. पाटील, यु. व्ही. पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.