प्रतिनिधी/ महाबळेश्वर
महाराष्ट्राचे लाडके थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर हे प्रसिध्द आहे. येथील पर्यावरणाला अनन्यसाधारण महत्व आहे. पर्यावरण आहे म्हणुन येथे थंड हवा आहे. थंड हवा आहे म्हणुन येथे स्ट्रॉबेरी आहे आणि या सर्वांवर येथील पर्यटन अवलंबुन आहे. येथील पर्यावरणाला हात न लावता पर्यटनवाढीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाबळेश्वर येथे एका बैठकीत बोलताना दिला. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई हे उपस्थित होते.
येथील राजभवनाच्या भव्य सभागृहात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाबळेश्वर व पांचगणी पर्यटन कृती आराखडा या संदर्भात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मिलिंदजी नार्वेकर, आमदार अजय चौधरी, जिल्हाधिकारी शेखर सिंह, वनसंरक्षक, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, वन विभागाचे उपवनसंरक्षक भारत हाडा, प्रांताधिकारी संगिता चौगुले राजापुरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, शिवसेना जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दोन तास चाललेल्या महत्वाच्या बैठकीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्हय़ाचा पर्यटन आढावा सादर केला. जिल्हा पोलीस प्रमुख यांनी महाबळेश्वर येथील वाहतूक समस्या व त्यावरील उपाय या बैठकीत विषद केले. याच बैठकीत वर सदृश्य मिळकती व त्याबाबत हरित लवाद यांनी दिलेले आदेश याबाबत माहिती सादर करून वन विभागाचा आढावा कोल्हापूर येथील वनसंरक्षक या बैठकीत सादर केला. कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकाऱयांनी महाबळेश्वर येथील कृषी विषयाचा आढावा सादर करताना स्ट्रॉबेरी पिकाची सविस्तर माहिती दिली व येथे स्ट्रॉबेरी पिकाचे संशोधन केंद्र राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली.
सर्व विभागांनी आपला आढावा सादर केल्यानंतर मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, स्ट्रॉबेरी या एका पिकासाठी संशोधन केंद्र सुरू करण्यापेक्षा या एकाच केंद्रात स्ट्रॉबेरीबरोबर संत्री, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष यांचेही संशोधन येथे झाले तर त्याचा फायदा संपुर्ण राज्याला होईल. कृषी विभागाने याबाबतची तयारी करावी गरज वाटली तर परेदशी तंत्रज्ञानाची मदत घ्या. येथील स्ट्रॉबेरीची निर्यात झाली पाहिजे अशा पध्दतीने जिद्दीने उतरा. राज्याच्या कृषी विभागाने तातडीने या संदर्भात अहवाल सादर करावा, असे आदेश यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले.
महाबळेश्वर हे देशातील सुंदर पर्यटनस्थळ आहे. येथील पर्यावरणामुळे या शहराच्या विकासाला कमी संधी आहे. तरीदेखील येथील पर्यावरण टिकवुन शहराचे सौंदर्य कसे खुलविता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक शहराला एक खास चेहरा असतो हा चेहरा त्या शहराची ओळख बनतो तशा पध्दतीने महाबळेश्वर या पर्यटनस्थळाकडे पाहिले पाहिजे आणि हळुहळु ते त्या पध्दतीने विकसित झाले पाहिजे. येथील घरे, हॉटेल, बंगले, दुकाने, रस्ते, संरक्षक कठडे, उद्याने, चौक यांचा विकास करताना शहराचा एक चेहरा समोर आला पाहिजे. वरून पाहिले तरी आपले महाबळेश्वर आहे हे ओळखता आले पाहिजे. येथील घर पाहिले की महाबळेश्वरची आठवण झाली पाहिजे. रस्ते कठडे पाहिले की शहराची ओळख पटली पाहिजे. इतरत्र कोठेही दिसणार नाहीत अशा सर्व गोष्टींचा समावेश यामध्ये केला पाहिजे हे सर्व स्पष्ट करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी भुतान येथील उदाहरण सांगितले. या छोटय़ा देशाला करता येत असेल तर मग आपल्याला का करता येवु शकत नाही, असा सवालही त्यांनी अधिकाऱयांना केला. येथे गर्दी होते आणि विशेष म्हणजे हंगामात गर्दीचा उच्चांक गाठला जातो आणि मग सर्व समस्या उभ्या राहतात. त्यामुळे शहरातील गर्दीचे विकेंद्रिकरण केले पाहिजे. त्यासाठी महाबळेश्वरच्याजवळ असलेले अनेक पर्यटनस्थळांचाही विकास झाला पाहिजे. किल्ले प्रतापगड असेल, तापोळा असेल अथवा येथील अभयारण्य असेल याठिकणी सहज जाता येईल अशा सर्व सुविधा येथे आलेल्या पर्यटकांना मिळाल्या पाहिजेत. महाबळेश्वर या पर्यटनस्थळाला जोडले जाईल, असे सर्कल तयार करून या सर्कलचाही विकास झाला तरच गर्दीचे विकेंद्रिकरण होईल. महाबळेश्वर, पांचगणी पर्यटनस्थळांची पर्यटन विषयक विविध प्रश्न जे शासन दरबारी प्रलंबित आहे. त्या सर्व प्रश्न सोडविण्याबाबत तातडीने पाऊल उचलले जाईल, असा विश्वासही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.