प्रतिनिधी/इचलकरंजी
राष्ट्रीय पर्यावरणीय आणीबाणी जाहीर करून जलदगतीने उपाय सुरू व्हावेत, यासाठी विद्यार्थ्यांनी पर्यावरण बचावचा नारा देत जनजागृती केली. यावेळी पर्यावरण आणीबाणीसाठी शुक्रवारी विद्यार्थ्यांनी मानवी साखळी केली. पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर करत मानवी साखळीत सहभागी झालेल्या विद्यार्थी, शिक्षकांनी परिवर्तनाचा अनोखा संदेश दिला. पर्यावरण आणिबाणीसाठी जागतिक पातळीवर फ्रायडेज फॉर फ्युचर हे जनआंदोलन सुरू केलेल्या पंधरा वर्षाच्या ग्रेटा थनबर्ग यांचा जन्मदिवस व पाठिंबा देण्यासाठी मानवी साखळी करून उपाय योजनांबाबत जनजागृती केली.
येथील छत्रपती शिवाजी पुतळा ते कॉम्रेड मलाबादे चौक या प्रमुख मार्गाच्या दोन्ही बाजूला विद्यार्थ्यांनी मानवी साखळी केली. डोक्यावर कागदी टोपी, नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व्हावे, यासाठी रंगरंगोटी केलेले चेहरे, प्रदुषण मुक्तीसाठी सायकलीचा वापर, आदी गोष्टींनी जनजागृती मानवी साखळीत वेगळीच झलक आणली. माणसा माणसा जागा हो, पर्यावरणाचा धागा हो, अशा घोषणा देत आदर्श विद्या मंदिर, सरस्वती हायस्कूल, सईबाई बाल विद्या मंदिर, चाटे स्कुल, मयूर हायस्कूल या शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच शहरातील ग्रीन इचलकरंजी संघटनेच्या पर्यावरणावादी कार्यकर्ते मानवी साखळीत सहभागी झाले होते.