ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाचे नाव आता ‘पर्यावरण व वातावरणीय बदल’ विभाग असे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. लवकरच मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हा बदल करण्यात येईल. तसेच पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग हा निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या पंचतत्वांवर कार्य करेल, अशी घोषणा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केली.
विभागातील नावाच्या बदलासह विभागाचे ध्येय व उद्दिष्टे अधिक व्यापक करत त्यात सध्याच्या वातावरणातील बदल व त्याअनुषंगाने तातडीने करावयाच्या उपाययोजनांचा अंतर्भाव करण्यात आल्याची ठाकरे व बनसोडे यांनी दिली. युनायटेड नेशन्स एनव्हायरमेंट प्रोग्रामने (UNEP) “जागतिक पर्यावरण दिन 2020” ची संकल्पना “Time For Nature” अशी निश्चित केली असून त्या अनुषंगाने विभागाने राज्य शासनाच्या इतर संबंधित विभागांसह वातावरणीय बदलांबाबत उपाययोजना करत निसर्गपूरक जीवन पध्दतीसाठी कृती आराखडे तयार केले आहेत. तसेच राज्य शासनाची निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी यावर्षी या विभागामार्फत 100 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही आदित्य ठाकरे आणि बनसोडे यांनी जाहीर केले.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग हा निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश पंचतत्वांवर कार्य करेल. पृथ्वी तत्वाशी संबंधीत वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमीनीचे धुपीकरण इत्यादी बाबींवर हा विभाग कार्य करेल. तसेच हवेच्या गुणवत्तेसाठी हा विभाग उद्योग, परिवहन व इतर विभागांना सहकार्य करुन वायूप्रदूषण कमी करुन महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता सुधारेल व वायू तत्वाचे संरक्षण करेल. तसेच जल तत्वाशी संबंधीत नदी संवर्धनाच्या सद्य:स्थितील चालू कामांसह सागरी जैव विविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच सागरी किनारे यांची स्वच्छता यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.