ऑनलाईन टीम / पुणे :
‘ग्लोबल वॉर्मिग’ च्या काळात पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. जगाचा डोलारा पर्यावरणावर अवलंबून आहे, हे विसरून चालणार नाही. पर्यावरण संवर्धनासाठी पर्यावरण साक्षरता समाजाच्या प्रत्येक घटकात घडवून आणणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन बायोस्फिअर्स संस्थेचे संचालक डॉ सचिन पुणेकर यांनी केले.
महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘कार्बन ऑडीट आणि ग्रीन इकॉनॉमिक्स ‘ या विषयावरिल राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन ‘ बायोस्फिअर्स’ संस्थेचे संचालक डॉ सचिन पुणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी डॉ. पुणेकर बोलत होते.
ही कार्यशाळा संस्थेच्या हाय टेक हॉल येथे २४ आणि २५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ शैला बुटवाला,पर्यावरणशास्त्र विषयाच्या विभाग प्रमुख विजयालक्ष्मी शिंदे, डॉ गौरी देवस्थळे यावेळी उपस्थित होत्या. एनर्जी ऑडीट,कार्बन फुटप्रिंट ,कार्बन ट्रेडिंग ,लँड युज ,कार्बन उत्सर्जन विषयक धोरणे ,अशा विषयांवर या परिषदेत चर्चा होत आहे .
डॉ सचिन पुणेकर म्हणाले,’ शाश्वत विकासासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी ‘सस्टनेबल डेव्हलमेंट गोल ‘ डोळ्यासमोर ठेवले पाहिजेत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्नांची गरज आहे. नॅनो फर्टीलायझर्सचा जमाना येत आहे, पाण्याचा- खतांचा कमीत कमी वापर करून कृषी उत्पन्न वाढविण्याचे संशोधन करण्याची गरज आहे. ‘ ग्लोबल वॉर्मिंग ‘ च्या जमान्यात पर्यावरणाचे संतुलन ढळू देता कामा नये. ‘इकॉनॉमी वाढविण्याच्या नादात ‘ इकॉलॉजी ‘ गमावून चालणार नाही. पर्यावरण साक्षर ग्राहक घडविणे, ही देखील मोठी जबाबदारी आहे. पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील रोजगार संधी वाढत असल्याने पर्यावरण शास्त्र विद्यार्थ्यांनी हे आव्हान स्वीकारले पाहिजे.
निसर्गाशी नाळ तुटत असताना पर्यावरण साक्षरता वाढविण्यासाठी, पर्यावरण विषयक परिषदांमधून जनजागरण करण्याची गरज आहे, असेही डॉ सचिन पुणेकर यांनी सांगितले.डॉ. प्रियदर्शिनी कर्वे,प्रा. आर. ई. मार्टिन, डॉ. प्रमोद कांबळे, डॉ. नीलेश वाघ, डॉ. रसिया पडळकर, डॉ. भूषण पाचपांडे या परिषदेत सहभागी झाले.