अखेरच्या दोन दिवसांसाठी सर्वोच्च न्यायालयाची अनुमती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वाला सुरुवात झाली असून मंदिर उघडणार की नाही, अशी चर्चा सुरू असतानाच मुंबईतील तीन ठिकाणी मंदिर खुली करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. यामध्ये दादर, भायखळा आणि चेंबूर येथील जैन मंदिरे प्रार्थनेसाठी खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पर्युषण पर्वाच्या अखेरचे दोन दिवस मंदिर उघडण्यात येणार आहे. 22 आणि 23 ऑगस्टला मंदिरे खुली राहणार असून केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या नियमांचे पालन करण्यात यावे, असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने हा निर्णय दिला आहे
कोरोना संकटामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच दरम्यान येणाऱया सण उत्सवावर देखील मर्यादा आल्या आहेत. कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून प्रत्येक सणासाठी सरकारकडून नियमावली ठरवली जात आहे. विशेष गर्दी टाळण्याच्या उद्देशाने राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वालाही सुरुवात झाली असून मंदिर उघडणार की नाही, अशी चर्चा सुरू होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मुंबईतील तीन ठिकाणी जैन मंदिर उघडण्याची परवानगी दिली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून सण आणि उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले होते. 15 ऑगस्टपासून जैन बांधवांच्या पर्युषण पर्वाला सुरुवात झाली आहे. या काळात मुंबईतील जैन मंदिरे खुली करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने केवळ तीनच मंदिरांना अखेरचे दोन दिवस उघडण्यास परवानगी दिली आहे.