प्रतिनिधी/ पणजी
गोव्यात रू. 35 हजार कोटींचा खाण घोटाळा अस्तित्वात नसल्याचे उत्तर खाण खात्यानेच लेखी स्वरुपात दिल्याने माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी गवगवा केलेला व सार्वजनिक लेखा समितीमार्फत (पीएसी) जाहीर केलेला सदर घोटाळा म्हणजे केवळ षडयंत्र होते, असा दावा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. तो पीएसी अहवाल आहे कुठे? असा प्रश्न करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी तो अहवाल जनतेसाठी जाहीर करावा, असे आव्हान चोडणकर यंनी दिले आहे.
पणजीत काँग्रेस भवनात काल गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत चोडणकर यांनी खाण खात्याने पाठवलेले पत्र पुरवा म्हणून सादर केले. शहा आयोगाच्या अहवालाचा आधार घेऊन पर्रीकर यांनी विरोधी पक्षनेते असताना पीएसी अहवाल तयार केला आणि गोव्यात रू. 35 हजार कोटीचा खाण घोटाळा झाला म्हणून गवगवा केला होता.
घोटाळय़ाच्या निमित्ताने निवडणूक जिंकली
या घोटाळ्याचे निमित्त करून काँग्रेस पक्ष नेत्यांची बदनामी केली आणि त्याचा गैरवापर करून 2012 ची विधानसभा निवडणूक भाजपने-पर्रीकरांनी जिंकली. त्यानंतर खाणी बंद करून गोव्याची आर्थिक परिस्थिती कोलमडून टाकली. खाणीवर अवलंबून असणाऱयांचे संसार उद्ध्वस्त केले आणि गोव्याला भाजपने संपवले, अशी टीका चोडणकर यांनी केली.
पंतप्रधानांना पत्र पाठविल्यानंतर सत्य उघडकीस
गोव्यात रू. 35000 कोटीचा खाण घोटाळा झाला म्हणून पाळी येथील एक रहिवासी लाडू आत्मा गावस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आणि या प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्या पत्राची दखल घेऊन पंतप्रधान कार्यालयाने ते पत्र गोवा सरकारच्या सार्वजनिक तक्रार खात्याकडे पाठवले आणि तेथून ते खाण खात्याकडे पाठवण्यात आले. पंतप्रधान कार्यालयाचा संदर्भ असल्याने खाण खात्याने त्याचे लेखी उत्तर गावस यांनी पाठवले असून त्यात अशा प्रकारचा रू. 35000 कोटीचा घोटाळा झाल्याच नसल्याचे नमूद करण्यात आल्याचे चोडणकर यांनी निदर्शनास आणले.
पीएसी अहवाल सादर करा
या घोटाळ्याचा बाऊ करून खाणी बंद करण्यात आल्या आणि लाखो लोकांचा रोजगार बुडाला. बेकारी वाढली-गोवा राज्याचे कर्ज वाढले. घोटाळ्याच्या नावाखाली पर्रीकर-भाजपाने फक्त खोटे बोलून थापेबाजी केला आणि गैरवापर करून सत्ता काबीज केली. गोमंतकीय जनतेलाही फसवण्यात आले. सत्ता हस्तगत करण्यासाठीचे हे एक कारस्थानच होते. त्या पीएसी अहवालावरून हे कारस्थान शिजवले तो अहवाल कुठे आहे ? तो सदर करा, अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.
आठ वर्षांत खाणी का सुरु झाल्या नाहीत?
गोव्यात आणि केंद्रात गेली 8 वर्षे भाजप सरकार आहे. मग गोव्यातील खाणी का सुरू होत नाहीत ? असा प्रश्न चोडणकर यांनी केला. खाणी सुरू करण्याचे खोटे आश्वासन देऊन निवडणुका जिंकण्याचे कारस्थान मात्र सुरूच आहे. या सरकारला खाणी सुरूच करायच्या नाहीत. हेच स्पष्टपणे दिसते असे चोडणकर म्हणाले. पर्रीकर यांनी ज्या पीएसी अहवालाचा व त्याद्वारे खाण घोटाळ्याचा बोलबाला केला तो अहवाल आहे कुठे ? तो जि.पं. निवडणुकीपूर्वी जनतेसाठी जाहीर करा अशी मागणी चोडणकर यांनी केला.
जिल्हा पंचायतींसाठी काँग्रेसचे 36 उमेदवार रिंगणात
काँग्रेस पक्षाने जिल्हा पंचायत निवडणुकीत 36 जागांवर उमेदवार उभे केले असून 2 जागांवर अपक्षांना पाठिंबा दिला आहे. उत्तर गोव्यात 20 जागा तर दक्षिण गोव्यात 16 जागांवर काँग्रेस पक्ष जि.पं. निवडणूक लढवत आहे अशी माहिती गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली आहे. ताळगाव जिल्हा पंचायत मतदारसंघात सिसिल रॉड्रीग्स तर बार्से जि.पं. मतदारसंघात म्हाळू वेळीप यांना काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. म्हणजे काँग्रेस पक्ष एकूण 38 जागा लढवत असून 26 जागांवर तरी विजय संपादन करू अशी खात्री चोडणकर यांनी प्रकट केली.