अध्याय सातवा
यदुराजा आणि अवधूत यांच्यातील संवाद आपण अभ्यासत आहोत. परमानंदात निमग्न असलेल्या अवधुताना यदुने त्यांच्या आनंदाचे कारण सविस्तर सांगायची विनंती केली. त्यावर अवधूत म्हणाले, ‘राजा गुरुशिवाय उद्धार होत नाही ही बाब लक्षात घेऊन मी सद्गुणी आणि दुर्गुणी अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना गुरु मानले. त्यामुळे जगातले सर्वचजण माझे गुरु झाले. गुणी लोकांचे गुण घेतले आणि दुर्गुणी लोकांचे दुर्गुण आपल्यात येऊ नये म्हणून खबरदारी घेतली. एकूण चोवीस प्रमुख गुरु केले. त्यापैकी पहिला गुरु म्हणजे पृथ्वी, कारण पृथ्वी ही परम शांतीसाठी प्रसिद्ध आहे. तिला कुणीही कशीही इजा केली, अपमान केला तरी ती सगळय़ांच्यावर उपकारच करत असते. पृथ्वीची महती सांगून झाल्यावर पर्वत आणि वृक्ष यांच्या गुणाबद्दल अवधूत आता बोलणार आहेत. अवधूत म्हणाले, ‘पृथ्वीपासून तयार झालेल्या पर्वतांनाही मी गुरु केले आणि त्यांच्यापासून काय शिकलो ते ऐक. पर्वताकडे रत्नादी पदार्थांचा संग्रह असतो, तो केवळ लोकांना देण्यासाठी! गवत, पाणी किंवा दुसरे अनेक पदार्थ तो केवळ परोपकाराकरता याचकाच्या इच्छेप्रमाणे त्यांना देत असतो. यात तो कधीच माघार घेत नाही. म्हणून ईश्वर त्याच्यावर आणखी पाऊस पाडून त्याला समृद्ध करत असतात. दाता जो जो उल्हासाने देऊ लागतो तो तो जगन्नाथ त्याला उत्साहाने पुरवठा करत असतो. मनात शंका ठेवली नाही तर अच्युत भगवान अनिवार देत असतो. पर्वताची उत्पत्ती केवळ परोपकाराकरताच असते. साधकामध्ये पर्वतासारखी उदारता असावी. काया, वाचा, मनाने देत असताना प्रसन्नता असावी. सर्व व्यवहार करत असताना सतत उपकार करत असावे. परोपकारात देह कष्टवावा. ऊस जसा आपल्या अंगच्या गोड गुणांनी सर्वांवर उपकार करत असतो त्याप्रमाणे योग्याने संसारात राहून आपल्या गोड वर्तनाने सदैव उपकार करत असावे. पर्वतातून जसे नैसर्गिक झरे फुटत असतात तसे योग्याला उपकाराचे पाझर फुटत असावेत. आता वृक्षापासून काय शिकलो ते ऐक, सर्वांगाने, सर्वतोपरी, सर्वकाळ आणि सर्वत्र पराधीनतेत असावे हेच मी वृक्षापासून शिकलो. त्याला जो लावतो त्याच्या तर तो आधीन असतोच पण त्याला तोडणाऱयाच्याही तो आधीन असतो. तसेच योगीही सर्वांच्या आधीन असतो. सर्वात आत्मा एकच आहे हे लक्षात आल्यावर अशी आधिनता शक्मय होते. आपले आपण काहीही करण्याला समर्थ आहोत असे माणसाला उगीचच वाटत असते पण प्रत्यक्षात आपले दैनंदिन आयुष्य अनेक वस्तूवर, व्यक्तीवर अवलंबून असते ही लक्षात ठेवण्याची गोष्ट असून त्या सर्वांबद्दल आपल्या मनात सदैव कृतज्ञ भाव हवा हे लक्षात घेऊन अवधुतानी वृक्षाला गुरु मानले. अतिथीपूजन हा आणखी एक गुण मी वृक्षापासून शिकलो. जो कोणी येईल त्याला तो पान, फूल, फळ, साल, लाकूड यापैकी काही ना काही देत असतो. ज्याप्रमाणे वृक्ष आपला सर्व देह याचकांना देऊन टाकतो त्याप्रमाणे साधुही आपले तन, मन, धन व शब्द प्रेमाने दुसऱयाला देऊन टाकतो. म्हणून याचकाला विन्मुख पाठवायचे नाही हे मी वृक्षापासून शिकलो.’