अन्यथा होणाऱया परिणाम सरकार जबाबदार : रोहन खंवटे
प्रतिनिधी / पर्वरी
पर्वरी मतदारसंघात दिवसेंदिवस पाणी टंचाईची समस्या गंभीर बनत आहे. मतदारसंघातील नागरिकांच्या सोयीसाठी जीसीए मैदानासमोर उभारलेल्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पाला येत्या आठ दिवसात पाणीपुरवठा न केल्यास होणाऱया परिणामास सरकार जबाबदार राहील, असा इशारा आमदार रोहन खंवटे यांनी येथे पत्रकार परिषदेतून दिला.
पर्वरी मतदारसंघातील सुकूर, साल्वादोर दु मुन्दू, पेन्ह द फ्रान्स पंचायतीचा भाग एकत्र बाजूला असल्याने पाणीपुरवठय़ावर परिणाम दिसून येतो. दर दिवशी 15 ते 16 एमएलडी पाण्याची गरज भागविण्यासाठी पाणीपुरवठा खात्याची यंत्रणा कुचकामी ठरत आहे. यावर उपाययोजनेसाठी आपण महसूलमंत्री असताना येथील जीसीए मैदानासमोर असलेल्या तळय़ावर तिलारी पाणी प्रकल्पातून कच्चे पाणी आणून त्यावर जलशुद्धीकरण प्रक्रिया करून मतदारसंघातील लोकांचा पाणीप्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला होता. तसेच या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे कामही पूर्णत्वाकडे नेले. परंतु या प्रकल्पासाठी लागणारे कच्चे पाणी पुरवठा करण्यासाठी संबंधित खात्याने जलवाहिनी टाकली नाही. तिलारी प्रकल्पाचे पाणी गिरी बार्देश पर्यंत अणले. परंतु पाणी पर्वरीपर्यंत पोहचू शकले नाही, असे आमदार खंवटे यांनी सांगितले.
येथील उच्च न्यायालयासाठी नवीन जलवाहिनी टाकण्यात आली त्यावेळी आमदार रोहन खंवटे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना जाणीवर करून देऊन पाणी शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्याची मागणी आजपर्यंत पूर्ण झाली नाही. पर्वरी मतदारसंघात पाणीपुरवठा खात्याच्या टाकीतून पाणी टँकरद्वारे मोठ मोठय़ा हॉटेलना पुरवण्यात येते. परंतु स्थानिक लोकांसाठी टॅंकर उपलब्ध होत नाही. काही टँकरवाल्यांची बिले थकली आहेत. त्यामुळे त्यांनी टँकर बंद केले. त्याचा परिणाम मतदारसंघातील नागरिकांवर झाला, असे खंवटे म्हणाले.
नळाद्वारे पाणीपुरवठा नियमित होत नाही. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास खात्याकडे सुविधा नाही. या परिस्थितीत नागरिकांची विशेषतः महिलांची पाण्यासाठी कुचंबणा होते. पाण्यासाठी हाल होतात. यामुळे नागरिकांचा संयम सुटण्याची वेळ आली आहे. सरकार घराघरात नळ ही योजना करते, परंतु प्रत्यक्षात काहीच नाही. सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी पाण्यासाठी राजकारण करू नये. सर्वांना पाणी मिळेल याची सोय करावी, अशी मागणी यावेळी खंवटे यांनी केली.
येथील पाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी पाणीपुरवठा करून प्रकल्प सुरू करावा, नागरिकांचा पाण्यासाठी होणारा त्रास कमी व्हावा, नागरिकांचा संयम सुटण्याआधी योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा होणाऱया परिणामास सरकार जबाबदार राहील, असा इशारा आमदार खंवटे यांनी दिला.