प्रतिनिधी /पणजी
पर्वरी येथील मॉल दी गोवा समोर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर बेशिस्तपणे वाहन पार्कींग होत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. रस्त्याच्या बाजूला नो पार्कींग जागेतही वाहने पार्कींग केली जातात. पोलीस नियमितपणे त्या परीसरात फेरफटका मारीत असतात, मात्र बेशिस्तपणे केलेल्या वाहन पार्कींग विरोधात कोणतीही कारवाई करीत नाही, हे असे का असा प्रश्न वाहन चालक उपस्थित करीत आहेत.
म्हापसा तसेच कळंगुट भागातून पर्वरी मार्गे पणजीच्या दिशेने येण्यासाठी तसेच जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे. वास्तविक हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने नियमितपणे वाहनांची वर्दळ सुरुच असते. अशा स्थितीत भर रस्त्यावरच वाहन पार्कीग होत असल्याने वाहतूकीचा खोळंबा होत असतो. अनेकवेळा अपघातांनाही निमंत्रण मिळत असते. कोणतीही मोठा अपघात होण्यापूर्वीच बेशिस्त पार्कींगवर कारवाई करावी अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे. पर्वरी येथील ओ कॉकेरो ते गोवा शालांत महळ बसस्टॉप पर्यंतचा रस्त्यावर नियमितपणे वाहनांची वर्दळ सुरु असते. दर दिवशी हजारो संखेने वाहने या रस्त्यावरून धावत असतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठमोठी दुकाने, हॉटेल असल्याने या दुनावर तसेच हॉटेलवर येणाऱया ग्राहकांची वाहने मुख्य रस्त्याच्या बाजूलाच पार्कींग केली जातात. याच रस्त्याच्या बाजूला मॉल दी गोवा असून या मॉलमध्ये मोठय़ासंखने येणारे ग्राहकही रस्त्याच्या बाजूलाच वाहन पार्कींग करीत असतात. या साऱया प्रकारामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होतो. याबाबत आवाज उठविल्यानंतर रस्त्याच्याबाजूलाच नो पार्कींगचे फलक लावण्यात आले होते. त्या फलकांकडे डोळेझाकपणा करून बेशिस्तपणे वाहन पार्कींग केले जाते. या साऱया प्रकारात पोलिसांचेही हात गुंतलेले असल्याने पोलीस या गोष्टीकडे डोळेझाकपणा करीत असल्याचा आरोप काही वाहनचाकांनी केला आहे.