दिल्ली दरबारी द्वयींची तासभर भेट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात शनिवारी सकाळी दिल्लीत बैठक झाली. शरद पवारांनी मोदींची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. त्यातच शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, असाही तर्क लावण्यात येत होता. तथापि, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी याबाबत भाष्य करताना केंद्र सरकारने नव्याने तयार केलेल्या ‘सहकार’ खात्याच्या अनुषंगाने त्या क्षेत्रातील परिस्थितीसंबंधी द्वयींमध्ये चर्चा झाल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मोदींच्या भेटीला पोहोचल्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये वेगवेगळय़ा चर्चा सुरू झाल्या. जवळपास तासभर या दोन्ही नेत्यांची भेट झाली असली तरी नेमकी कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली, याविषयी निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकार अस्थिर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसही दिल्लीत डेरेदाखल झाल्याने राजकीय तर्क-वितर्कांना अधिकच उधाण आले होते. पवार-मोदी भेटीमागे महाराष्ट्रातील राजकारण, राष्ट्रपतीपदाची चर्चा, स्वतंत्र सहकार खाते आणि राज्यातील सहकार क्षेत्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमागे लागलेला केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा अशा अनेक मुद्यांचे अंदाज बांधले जात होते. मात्र, जयंत पाटील यांनी ‘सहकार’ क्षेत्रावर चर्चा झाल्याची सारवासारव केली असली तरी या भेटी-गाठींमध्ये वेगळेच काहीतरी घडत असल्याची चर्चा राजकीय पातळीवर सुरू आहे.
‘सहकार मंत्रालय’ विषय चर्चेच्या केंद्रस्थानी
केंद्र सरकारने नवे सहकार मंत्रालय स्थापन केले आहे. सहकार हा राज्याचा विषय आहे. त्यामुळे तो केंद्राच्या अधिकारात येत नसल्याचा दावा राष्ट्रवादीकडून केला जातोय. यावरून राज्य आणि केंद्र सरकार यांच्या अधिकाराबाबत स्पष्टता येणे गरजेचे आहे. यासंदर्भात संसदेत कायदा आणता येईल का? यावरही चर्चा झालीय. त्याशिवाय, राज्यातील सहकाराशी संबंधित अडचणी पवारांनी मोदींसमोर मांडल्याचे सूत्रांकडून समजते.
कृषी, संरक्षण विषयावरही चर्चा
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी शुक्रवारी शरद पवार आणि ए. के. अँटनी यांच्यासोबत संरक्षण सज्जतेसंबंधी चर्चा केली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदींशीही याच विषयावर सविस्तर चर्चा झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. तसेच केंद्र सरकारने तीन कृषी कायदे संसदेत पास केले. यावरून देशभर विरोध होत आहे. दुसरीकडे दिल्लीच्या सीमेवर 8 महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. त्यामुळे कृषी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी पवार यांनी मोदींकडे केली. ही मागणी करतानाच कृषी कायदे रद्द करण्याची गरज नसल्याचेही पवार यांनी म्हटले होते. यासंबंधीही दोघांमध्ये चर्चा झाल्याची अटकळ बांधली जात आहे.
जयंत पाटील यांची स्पष्टोक्ती
जयंत पाटील यांनी पवार-मोदी भेटीमागे सहकार क्षेत्रातील परिस्थिती हे मुख्य कारण असल्याचे सांगितले. “देशाच्या वेगवेगळय़ा भागातल्या सहकारी बँकिंग क्षेत्रातल्या लोकांनी गेल्या महिन्या-दीड महिन्यात अनेक पत्रे पाठवली. त्या सगळय़ांचा विचार करून केंद्र सरकारने यात लक्ष घातले पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेला योग्य त्या सूचना दिल्या पाहिजेत, यासाठी शरद पवार त्यांना भेटायला गेले’’, असे जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केले आहे.