संसदेच्या हिवाळी अधिवेशनास उद्या प्रारंभ होत आहे. मंत्रिमंडळ विस्तार, पक्षांतर्गत धुसफूस आणि आगामी निवडणुका याच जोडीला चीनच्या कारवाया, नवे सहकार खाते यामुळे अधिवेशनापूर्वीच दिल्लीत राजकीय चर्चांचा धुरळा उडताना दिसत आहे. त्यातच शरद पवारांनी दिल्लीत भेटीगाठीचा धडाका लावल्याने चर्चांना उधाण आले आहे. पवारांनी गेले काही दिवस सर्व राजकीय चर्चांचा केंद्रबिंदू होण्यात यश संपादन केले आहे. पवारांचे वय, राजकीय बळ आणि राजकीय संबंध याचा विचार करता नंबर एकचे पद झाले तर आता नाही तर मग कधीच नाही, अशीच वेळ आली आहे. त्यामुळे पवार आणि त्यांचे पश्चिम महाराष्ट्रातील पाठीराखे हाकारे घालायला लागले आहेत. मोदींनाही उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका, राष्ट्रपती निवडणूक, समान नागरी कायदा, कृषी आंदोलन, कोरोना महामारी असे अनेक विषय ‘आ’ वासून समोर उभे आहेत. बंगालच्या ममतांच्या विजयानंतर भाजपापुढे 300 प्लसचे आव्हान आहे. शरद पवारांनी प्रशांत किशोर यांच्या भेटीमागून भेटी घेऊन नवी रणनीती निर्धारित केली आहे. प्रत्येक प्रांतात प्रादेशिक अस्मिता जागवत मोदींना अडचणीत आणण्यासाठी तिसरी आघाडी व त्यांचे नेतृत्व शरद पवारांकडे. शरद पवार तिसऱया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा असा विषय घेऊन संबंधित काही मंडळी व स्वतः पवार उठा-बशा काढायला लागले आहेत. पण पवारांच्या या मनसुब्यांना काँग्रेसकडून विरोध होतो आहे. शरद पवारांना महाराष्ट्रात आणि दिल्लीत काँग्रेसची मनमोकळी साथ नाही. भाजपाला रोखायचे म्हणून महाराष्ट्रात काँग्रेसने आघाडीत सहभागी होत ठाकरे सरकारला समर्थन दिले असले तरी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवारांना रोज चिमटे काढायला प्रारंभ केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा भरोसा नाही म्हणून स्वबळाची तयारी वगैरे त्यांची विधाने आणि आपल्यावर पाळत ठेवली जात आहे. शरद पवार महाविकास आघाडीचे रिमोट कंट्रोल आहेत. विधानसभेचे सभापतीपद काँग्रेसचेच असे रोज नवे काही सांगत काँग्रेस आणि आपण शरद पवारांच्या कंपूतील नाही असे पटोले यांनी अधोरेखित केले आहे. शरद पवारांनी नाना पटोलेंसारख्या लहान माणसाकडे मी लक्ष देत नाही म्हणत पटोले व काँग्रेसला समज दिली असली तरी काँग्रेस योग्यवेळी, योग्य पाऊल टाकणार हे वेगळे सांगायला नको. काँग्रेसचे हे मनसुबे जाहीर झालेले नाहीत पण स्पष्ट दिसत आहेत. त्याच जोडीला महाराष्ट्रातील सचिन वाझे प्रकरण, शंभर कोटीची हप्ता वसुली, 48 सहकारी साखर कारखाने मातीमोल किमतीत पै-पाहुण्यांना विकणे, राज्य बँकेचा वापर, इडी चौकशी, देशमुख यांची साडेतीन कोटीची मालमत्ता जप्त, जरंडेश्वर प्रकरणात अजितदादा व सुनेत्रा पवार यांचे आलेले नाव वगैरे अनेक कंगोरे आहेत. पंतप्रधान मोदींनी नव्याने सहकार खाते निर्माण करुन त्याची जबाबदारी अमित शहांवर सोपवल्याने अनेकांची झोप उडाली आहे. ओघानेच दिल्लीत पवारांच्या या भेटीमागे अनेक कारणे आहेत. पवारांचे समर्थक साहेब राष्ट्रपती होणार, प्रशांत किशोरनी जुळणी केली आहे वगैरे हवा करत आहेत. जोडीला सहकार क्षेत्रासंदर्भात पवारांनी मोदींना मार्गदर्शन केले असेही सांगत आहेत. काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती आणि अजित पवार व अशोक चव्हाण यांना बाजूला करुन मोदींच्या समवेत तासभर बंद खोलीत खलबते केली होती. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. चर्चा खूप झाल्या. पण चर्चेचे गुऱहाळ असेच त्याचे स्वरुप झाले. पवारांनी त्यानंतर प्रशांत किशोर यांच्या भेटी-बैठका घेऊन काही आडाखे बांधले आणि तिसऱया आघाडीची मोट बांधायला सुरुवात केली. पवार कशात फार अडकत नाहीत आणि देशभरातील सर्व पक्षांच्या सर्व प्रमुख मंडळींशी त्यांची मैत्री आहे. त्यामुळे आपण तिसरी आघाडी बांधू. भाजपाला रोखू आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतो असे त्यांना वाटते आहे. पण कुणी बोलत नसले तरी ममता बॅनर्जीपासून अनेकजण या पदावर डोळा ठेवून आहेत. ओघानेच मैत्रीपेक्षा खासदार संख्या ही महत्त्वाची ठरणार पण निवडणुकीआधी पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पवार पुढे येऊ पाहत आहेत. तशी चर्चा उठवली गेली आहे. हे जमले नाही तर राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्याच नावाची चर्चा उठवली गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी पवार साहेब मोदींना सहकार क्षेत्रासंबंधी माहिती देण्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेसंबंधी चर्चा करण्यासाठी गेले असे म्हटले आहे. पण पवारांनी मोदींची ही भेट घेण्याआधी पियुष गोयल, राजनाथसिंह यांची भेट घेतली होती. खरे तर ज्येष्ठ राजकीय नेते एकमेकांना भेटले पाहिजेत. त्यांच्यात देशहिताच्या प्रश्नावर चर्चा, चिंतन झाले पाहिजे पण अलीकडे अशा भेटी व चिंतन होत नसल्याने अशा भेटीचे राजकीय अर्थ शोधले जातात. महाराष्ट्रात तीन विभिन्न विचारांच्या पक्षाची मोट बांधून शरद पवारांनी महाआघाडीची सत्ता मिळवली. उद्धव ठाकरे-मोदी भेटीनंतर आता पवार-ठाकरे भेटही असेच सुचवते आहे. काँग्रेसचे वारु आणि सेनेचे सैनिक जागेवर आणण्याचे काम या भेटीतून जसे साध्य होणार आहे तसा या भेटीतून काँग्रेसच्या पोटात गोळा येण्याची शक्यता आहे. कारण दिल्लीत नवीन चर्चा ऐकू येत आहे. त्यामध्ये महाआघाडीचा एक साथीदार वगळून सेना, राष्ट्रवादी, भाजपा अशी नवी आघाडी रचायची वगैरे बोलले जात आहे. ही सारी ‘बोलाची कढी’ आहे. यातून काय होणार हे लवकरच दिसेल. तूर्त पवारांची विश्वासार्हता नव्याने अडचणीत आली आहे. मोदींना संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कृषी कायद्यापासून चीन, पाकिस्तानप्रश्नी सर्वांची मदत हवी आहे. भेटी-गाठीचे तेच मर्म आहे.
Trending
- वाळवा तालुक्याच्या विकासासाठी मताधिक्य द्यावे : खास . धैर्यशील माने
- शेतकरी व महिलांच्या प्रश्नांवर भाजपने बोलूच नये : उमेश आपटे
- रात्रीचा दिवस करून धैर्यशील माने यांना उच्चांकी मतांनी निवडून आणू- प्रकाश आवाडे
- पक्षफोडीची नाराजी मतदानातून उमटेल : मालोजीराजे प्रतिपादन
- दक्षिणोत्तर विकास पर्वामुळे ‘दक्षिण‘ची जनता मंडलिक यांच्या पाठीशी- राजेश क्षीरसागर
- कोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा : दोन लाखावर लोक जमतील
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बेळगाव दौऱ्यात बदल
- दोन भावांचे मृतदेह सापडल्याने खळबळ