अर्थकारणावर परिणाम – ताळमेळ बसणे कठीण
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील पंधरा दिवसांत पशुखाद्याच्या किमतीत वाढ झाली आहे. विशेषतः सरकी पेंड, शेंगा पेंड, भुसा, तूरचुनी, कुळीथ आदी खाद्यांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. वाढत्या पशुखाद्यामुळे खर्चाचा ताळमेळ कसा बसवावा, असा प्रश्न दुग्ध उत्पादकांसमोर आहे.
अलीकडे शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाकडे कल वाढला आहे. त्यामुळे साहजिकच जनावरांची संख्या वाढली आहे. दरम्यान, अधिक उत्पादनासाठी जनावरांना पौष्टिक आहार दिला जातो. याकरिता विशेषतः सरकी पेंड, भुसा, शेंगा पेंड, तूरचुनी, हरभरा चुनी, मकाभरडा, कुळीथ आदी पशुखाद्याला प्राधान्य दिले जाते. मात्र, मागील काही दिवसांत पशुखाद्याच्या किमतीत भरमसाट वाढ झाल्याने पशुखाद्य खरेदी करणे पशुपालकांना कठीण झाले आहे. पोषक आहार म्हणून वापरली जाणारी सरकी पेंड व तुरीच्या चुनीचा दर वाढला आहे.
दुभत्या जनावरांच्या दुधावर अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, पशुखाद्याच्या वाढत्या दराने पशुपालकांच्या अर्थकारणावर परिणाम झाला आहे. जनावरांना समतोल आहार म्हणून मका, कोंडा, पॉलीश कोंडा, तांदूळ कणी आदींचाही वापर केला जातो. मात्र, कोंडादेखील मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे पशुपालकांना चढय़ादराने पशुखाद्य खरेदी करावे लागत आहे. 50 किलो सरकी पेंडचा दर 1300 रुपयांवरून 1500 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.