गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांचा आरोप
कोल्हापूर / प्रतिनिधी
गोकुळ दुध संघाच्या पशुखाद्य कारखान्याकडे पशुखाद्य वाहतुकीसाठी 50 गाडय़ा आहेत. निविदा प्रक्रियेनुसार पाच वर्षांसाठी मुरगूडमधील एका संस्थेला हा ठेका दिला आहे. पण पशुखाद्याची मागणी 13 हजार टनाने वाढल्याचे कारण पुढे करून आणखी 25 गाड्य़ा बेकायदेशीरपणे वाढवल्या आहेत. कार्यरत ठेकेदारास कोणतीही विचारणा न करता, तसेच त्याची आणखी 25 गाड्य़ा देण्याची क्षमता असतानाही त्याला डावलून राधानगरी तालुक्यातील घोटवडे येथील संस्थेकडून निविदा प्रक्रियेशिवाय 25 गाड्य़ा घेतल्या आहेत. ही बाब गंभीर असून केवळ बहुमताच्या जोरावर सहकाराचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. याविरोधात सहकार जिल्हा उपनिबंधकांसह न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी यांनी पत्रकार बैठकीत दिली.
महाडिक म्हणाल्या, दुध संघामध्ये पशुखाद्य वाहतुकीसाठी अचानकपणे कोणाच्या तरी सांगण्यावरून 25 गाड्य़ा भाडय़ाने घेतल्या असल्याची माहिती 18 जानेवारी रोजी समजली. त्यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया राबवली गेली नाही. किंवा सहकाराचे सकलेही नियम पाळले गेले नाहीत. त्याबाबत 19 जानेवारी रोजी मी स्वतः संघात जाऊन सर्व गोष्टींची पडताळणी केली. पण याबाबत चेअरमन विश्वास पाटील यांच्या परवानगीशिवाय माहिती देऊ शकत नसल्याचे संबंधित अधिकाऱयांनी सांगितले. याबाबत चेअरमनना प्रत्यक्ष भेटून माहिती देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी उद्या (20 जानेवारी रोजी) माहिती देतो असे सांगितले होते. पण आजतागायत माहिती देण्यासाठी टाळाटाळ सुरु आहे.
महाडिक म्हणाल्या, याबाबत मंगळवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत विचारणा केली असता 6 दिवसात तयार करून घेतलेले पूर्वीच्या तारखेचे पत्र मला दाखवले. पण त्या बैठकीत मी उपस्थित असल्यामुळे अशा पद्धतीचा कोणताही विषय मागील सभेत झालाच नव्हता. तरीही धडधडीत खोटी माहिती मला देण्यात आली. सत्ताधारी संचालकांनी अंतर्गत पातळीवर हा निर्णय घेतला असला तरी पशुखाद्य वाहतुकीसाठी घेतलेल्या गाडय़ांसाठी निविदा प्रक्रिया राबवणे बंधनकारक होते. तसेच जुन्या ठेकेदाराने गाड्य़ा पुरवण्यास असमर्थता दर्शवल्याचा कोणताही पुरावा नाही. मंगळवारी झालेल्या गोकुळच्या बैठकीत ‘माहिती देत नाही, काय करायचे ते करा’ अशा पद्धतीचे वक्तव्य चेअरमन विश्वास पाटील यांनी सलग दुसऱयांदा केले आहे. जर एखाद्या संचालकाला अशा भाषेत उत्तर दिले जात असेल तर सामान्य दुध उत्पादकांना हे काय न्याय देणार ? असा सवाल संतप्त महाडिक यांनी उपस्थित केला. केवळ बहुमताच्या जोरावर असे प्रकार घडत असतील तर आता कायदेशीर मार्ग अवलंबण्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय नसल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले.
गडमुडशिंगीसह कागल येथील दुध संस्थांचे दुध संकलन बंद करून शेतकऱयांवर मोठा अन्याय केला आहे. स्थानिक संचालकांचा आदर राखण्यासाठी नवीन संस्थेसाठी त्यांची शिफारस घेण्याचा पुर्वीपासूनच एक पायंडा आहे. पण हा पायंडा म्हाणजे कायदा नाही. आणि जर हातकणंगले तालुक्यातील दुध संस्था सुरु करण्यासाठी माझी शिफारस मान्य असेल तर गडमुडशिंगीतील दुध संस्थांनी इतर संचालकांची घेतलेली शिफारस बेकायदेशीर कशी ? असा सवाल शौमिका महाडिक यांनी उपस्थित केला. 20 लाखापर्यंत संकलन वाढवण्याचे उद्दीष्ट असताना अचानकपणे संकलन बंद करून दुध उत्पादक शेतकऱयांवर अन्याय केला आहे. मंगळवारी झालेल्या संचालकांच्या बैठकीत दुय्यम प्रतिचे दुध असल्यामुळे या संस्थाचे दुध नाकारले असल्याचे चेअरमन विश्वास पाटील यांनी सांगितले असले तरी जिह्यातील इतर दुध संस्थांचे दुय्यम प्रतिचे दुध का स्विकारले जाते ? असा सवाल महाडिक यांनी उपस्थित केला.