नवी दिल्ली/ वृत्तसंस्था
पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप ढंकर यांनी आपले दिल्लीतील वास्तव्य वाढविले आहे. त्यांनी राज्यातील निवडणुकीनंतरची परिस्थिती विशद करण्यासाठी दिल्लीदौऱयावर येण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी घेतला होता. गुरूवारी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर ते त्वरित कोलकाता येथे परतणार होते. तथापि, काही कारणास्तव त्यांनी दिल्लीतच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे. ते कदाचित शनिवारी पुन्हा अमित शहा यांना भेटतील. पश्चिम बंगालमध्ये अद्यापही हिंसाचाराच्या घटना घडत असून त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ममता बॅनर्जी यांना पत्र पाठविले होते. त्यामुळे त्यांची दिल्ली भेट आणि शहा यांच्याशी चर्चा महत्वाची मानण्यात येत आहे.