विश्वभारतीच्या संरक्षक भिंतीवरून गोंधळ
वृत्तसंस्था/ वीरभूम
पश्चिम बंगालच्या वीरभूमध्ये विश्वभारती (शांती निकेतन)च्या परिसरात संरक्षक भिंतीवरून सोमवारी मोठा गोंधळ झाला आहे. समाजकंटकांनी पौष मेळा मैदानावरील संरक्षक भिंतीच्या निर्मितीला विरोध करत उपद्रव माजविला आहे. या समाजकंटकांनी विद्यापीठाच्या मालमत्तेचे मोठे नुकसान घडविले आहे. विद्यापीठाने मैदानावर संरक्षक भिंत उभारणीचा निर्णय घेतला होता. मैदानात दरवर्षी हिवाळय़ात मेळय़ाचे आयोजन केले जाते.
शांती निकेतन परिसरानजीक सुमारे 4 हजार लोकांनी एकत्र येत मोठय़ा प्रमाणात तोडफोड केली आहे. तसेच जेसीबी यंत्राद्वारे विद्यापीठाचे प्रवेशद्वारही तोडून टाकले आहे. उपद्रवादरम्यान तृणमूल काँग्रेसचे आमदार नरेश बाउरी उपस्थित होते. विद्यापीठाने याप्रकरणी काहीही सांगण्यास नकार दिला आहे.
राज्यपालांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
विश्वभारतीमधील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन ममतांनी दिल्याची माहिती राज्यपाल जगदीप धनकड यांनी दिली आहे.
सेंट्रल हॉलमध्ये आंदोलन
विश्वभारतीतील एसएफआयच्या सदस्यांनी या तोडफोडीच्या विरोधात विद्यापीठाच्या सेंट्रल हॉलमध्ये आंदोलन केले आहे. विश्वभारती विद्यापीठाने मागील 100 वर्षांपासून आयोजित होत असलेला पौष मेळा यंदा आयोजित न करण्याचा निर्णय घेतला होता. स्थानिक व्यापाऱयांच्या एका समुहाने विद्यापीठाच्या अधिकाऱयांना मेळा मैदानावर संरक्षक भिंत उभारण्यापासून रोखले होते.