ऑनलाईन टीम / कोलकत्ता
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर बंगालमध्ये बरीच राजकिय उलथा – पालथ झाली. यात अनेक तृणमूलच्या नेत्यांनी निवडणुकी दरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला होता. निवडणूक होताच आम्हाला भाजपमध्ये थांबणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत काहींनी घरवापसी केली. हे स्थलांतर थांबते न थांबते तोच, काँग्रेसचे दोनवेळा लोकसभेत प्रतिनिधीत्व केलेले आणि भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
अभिजित मुखर्जी यांनी पक्ष प्रवेशावेळी काँग्रेसने आपल्याला प्राथमिक सभासदत्व वगळता काही दिले नाही. आता मी तृणमूल काँग्रेसचा सैनिक आहे. पक्षाच्या सुचनेनुसार काम करणार आहे. तसेच तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना भाजपच्या जातीय दंगली, हिंसाचार यांना रोखण्यात यश आले आहे. भविष्यात ही आम्ही अशीच कामगिरी करु, असे मुखर्जी यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बरेच नेते टीएमसीमध्ये सामील होत आहेत. नुकतेच मुकुल रॉय यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. आता अभिजित मुखर्जीही तृणमूलमध्ये दाखल झाले आहेत.