कोलकता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँगेसचे लोकप्रिय नेते सुवेंदु अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात बंड करून शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रविवारी भाजपच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भव्य रोड शो करून शक्तीप्रदर्शन केले आहे. बीरभूम जिल्हय़ातील बोलपूर येथे झालेल्या या रोड शो ला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे वृत्त आहे. शनिवारी सुवेंदु अधिकारी यांच्यासह तृणमूल काँगेसचे 7 आमदार, तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि काँगेसच्या एका आमदारानेही भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे राज्यात भाजपचे बळ वाढल्याचे बोलले जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या या राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱयावर आहेत. राज्यात येत्या मे महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. शहा यांनी रविवारच्या रोड शोच्या माध्यमातून भाजपच्या प्रचाराचे रणशिंगच फुंकल्याचे मानले जात आहे. यापुढे प्रचारची गती वाढविण्यात येईल, असे भाजपने स्पष्ट केले.
विक्रमी गर्दी
आपण आजवर अनेक रोड शो केले आहेत. मात्र एवढय़ा मोठय़ा प्रमाणात जनतेचा प्रतिसाद आजवर कधी अनुभवला नव्हता, अशा शब्दांमध्ये अमित शहा यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. राज्यातील जनता आता ममता बॅनर्जींच्या भ्रष्ट आणि अकार्यक्षम सरकारला कंटाळली असून तिला राजकीय परीवर्तन हवे आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. बॅनर्जींच्या काळात बांगला देशातून मोठय़ा प्रमाणात झालेल्या बेकायदा घुसखोरीपासूनही या राज्यातील जनतेला मुक्ती हवी आहे. आमची सत्ता आल्यास राज्याचा ‘शोनार बांगला’ करू असे उद्गारही अमित शहा यांनी रोड शो नंतर पत्रकारांशी बोलताना काढले.
रविंद्रनाथ टागोरांना मानवंदना
पश्चिम बंगालचे दैवत असणारे गुरूवर्य रविंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या विश्वाभारती संस्थेला भेट देऊन शहा यांनी टागोर यांना मानवंदना दिली. हे विश्वभारतीचे शताब्दी वर्ष आहे. रविंद्रनाथ टागोरांच्या कार्यामुळे भारताला साऱया जगात ख्याती प्राप्त झाली आहे. टागोर यांना मिळालेल्या नोबेल पुरस्कारामुळे या पुरस्काराचीच शान वाढली आहे, असे प्रशांसोद्गार त्यांनी काढले.