बंगाली मतदाराचा ममतांकडून विश्वासघात पंतप्रधान मोदींचा घणाघात, मिथून चक्रवर्तीचा भाजपमध्ये प्रवेश
कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी ‘माँ, माटी आणि माणस’ या तिघांचाही विश्वासघात केला आहे. हीच घोषणा देत त्या 10 वर्षांपूर्वी राज्यात सत्तेवर आल्या होत्या. तथापि, आज येथील मतदार त्यांच्यावर कमालीचा संतापला असून त्याला ‘खरे परिवर्तन’ हवे आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल आता भाजपच्या हाती सत्तासूत्रे देण्यास सज्ज आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील ‘ब्रिगेड मैदाना’त केले. या सभेला लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. याच सभेत हिंदी चित्रपट अभिनेता मिथून चक्रवर्तीने भाजपमध्ये प्रवेश केला.
आपल्या साधारण अर्ध्या तासाच्या भाषणात त्यांनी तृणमूल काँगेस प्रमाणेच काँगेस आणि डाव्या आघाडीवरही शरसंधान केले. प्रथम काँगेस, 1978 पासून डावी आघाडी आणि यानंतरची 10 वर्षे ममता बॅनर्जी यांनी राज्याची दुर्दशा केली. आज या राज्याला झपाटय़ाने विकास हवा आहे. तो देण्याची क्षमता केवळ भरतीय जनता पक्षातच आहे, असे ठाम प्रतिपादन त्यांनी या सभेत केले. गेल्या दहा वर्षांमध्ये तृणमूल काँगेसचे क्रौर्य जनतेने अनुभवले आहे. आता जनता हिंसा आणि भ्रष्टाचार सहन करण्यास तयार नाही, अशी टीका त्यांनी केली.
चहू अंगांनी विकास करणार
भाजपची सत्ता आल्यास राज्याचा चहुमुखी विकास करण्यात येईल. डॉक्टरी, इंजिनिअरींग आणि इतर तांत्रिक शिक्षण बंगाली भाषेतून देण्याची व्यवस्था करण्यात येईल. राज्यातील रस्त्यांची सध्या दुर्दशा झाली असून मार्ग उत्कृष्ट बनविण्याला आपल्या सरकारचे प्राधान्य असेल. रोजगार निर्मितीसाठी विशेष उपाययोजना करण्यात येईल. राज्याला त्याचे गतवेभव परत मिळवून देण्यासाठी शक्य ते सर्व उपाय केले जातील. राज्यात कृषी आणि उद्योग या दोन्हींचा विकास करण्यासाठी गुंतवणूक वाढविण्यावर भर असेल, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले.
‘हम दो हमारे दो’ चा समाचार
पंतप्रधान मोदी केवळ दोन उद्योगपती मित्रांच्या लाभासाठी धोरणे आखत आहेत. त्यांनी हम दो (पंतप्रधान मोदी आणि अमित शहा), हमारे दो (अंबानी आणि अडानी) हे ध्येय ठेवले आहे, असा आरोप काँगेस आणि राहुल गांधींनी केला होता. त्याला पंतप्रधान मोदींनी प्रत्युत्तर दिले. ज्यांच्याबरोबर आपण लहानपणापासून असतो, ते मित्र असतात. मी गरीबीत लहानाचा मोठा झालो. त्यामुळे गरीब हे माझे बालपणापासूनचे मित्र आहेत. त्यांच्या लाभासाठीच माझी धोरणे असतात. त्यामुळे मित्रांसाठी काम करणे हे माझ्यासाठी आनंददायक आहे. पण काँगेसला या आनंदाची कल्पना येणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.
केवळ भाच्यासाठी…
ममता बॅनर्जी यांच्यासाठी केवळ त्यांचा भाचा प्रिय आहे. त्याच्या लाभासाठीच त्या राजकारण करतात. राज्यापेक्षा त्यांना आपल्या राजकीय वारसाच्या हिताची चिंता आहे. पश्चिम बंगालला त्याची कन्या हवी आहे. मात्र, ममता बॅनर्जी या केवळ त्यांच्या भाच्याच्या आत्या असण्यापुरत्या मर्यादित आहेत. त्या कन्या होऊ शकत नाहीत. लोकांना आता तृणमूल आणि ममता बॅनर्जी यांचे खरे स्वरूप कळले असून यापुढे मतदार त्यांना संधी देणार नाहीत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
‘स्कूटी’च्या राज्याशीच वैर
ममता बॅनर्जी ची स्कूटी चालवितात, ती ज्या राज्यात तयार झाली आहे, त्या राज्याशीच (गुजरातशी) त्यांचे वैर आहे. यावेळी त्यांची स्कूटी नेहमीच्या भवानीपूर मतदारसंघात न जात नंदीग्रामकडे गेली आहे. आता ती तिथे जाऊन ‘पडणार’ असेल तर आम्ही तरी काय करणार, असा टोमणा पंतप्रधान मोदींनी मारला.
मिथून चक्रवर्तीचा प्रवेश
गेल्या पिढीतील गाजलेला हिंदी चित्रपट अभिनेता मिथून चक्रवर्ती याने या सभेत भाजपमध्ये प्रवेश केला. जनतेची सेवा आपण भाजपच्या माध्यमातून करणार आहोत. यावेळी राज्यात भाजपचा विजय निश्चित आहे, असे उद्गार त्याने काढले. ‘जीतेंगे बंगाल…कोई शक 4’ या त्याच्या उद्गारांवर टाळय़ांचा कडकडाट झाला. चक्रवर्ती हा काही वर्षांपूर्वी तृणमूलचाच खासदार होता. मात्र आपली तृणमूलने पूर्ण निराशा केल्यामुळे आपण भाजपमध्ये आलो आहोत, असे प्रतिपादन त्याने केले.
पाय ठेवायला नाही जागा…
या सभेला लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. ऐतिहासिक ब्रिगेड मैदान हे राज्याती सर्वात मोठे आहे. येथे नेहमीच राजकीय सभा होतात. तथापि हे मैदान पूर्ण भरलेले आहे, असा सभा क्वचितच आहेत. या सभेत मात्र अक्षरशः मैदानात पाय ठेवण्यास जागा नव्हती, असे वृत्त अनेक वृत्तसंस्थांनी दिले आहे. सभेला मिळालेल्या प्रतिसादामुळे भाजपच्या नेत्यांनी नंतर आनंद व्यक्त केला. ही सभा राज्यातील तृणमूलच्या अंताची नांदी ठरेल असा विश्वास भाजपने व्यक्त केला.
‘चहा’ पुन्हा चर्चेत
पंतप्रधान मोदी बालपणी रेल्वे स्टेशनवर चहा विकत असत. त्याचा संदर्भ घेत, त्यांनी पश्चिम बंगालमधील चहाच्या बागा आणि व्यवसायाचा उल्लेख केला. या उद्योगासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 1 हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या उद्योगाचे आधुनिकीकरण गेले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी म्हणतात
ड ममता दीदींनी रागाला आवर घालावा, माझा उल्लेख त्या रावण, दानव अशा शब्दांनी करतात. हे शोभनीय नाही हे त्यांनी जाणावे
ड कालपर्यंत जो काँग्रेसवा हात डाव्यांना काळा वाटत होता, त्याच हाताशी आज युती करून त्यांनी दांभिकतेचे प्रदर्शन केले आहे
ड बंगाली माणूस आता ममता बॅनर्जीं यांच्या मनमानी धोरणांमुळे संत्रस्त झाला आहे. त्याला राज्यात खरेखुरे परिवर्तन आता हवे आहे.
ड आजवर मी अनेक मोठय़ा सभा केल्या आहेत. पण या सभेला जो प्रतिसाद मिळाला आहे, तो निव्वळ अभूतपूर्व आहे हे निःसंशय