कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री आणि प्रमुख प्रचारक अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. राज्यात पहिल्या दोन टप्प्यांमधील मतदानाचा कल स्पष्टपणे भाजपच्या बाजूचा आहे. इतर टप्प्यांमध्येही भाजपचेच वर्चस्व राहिली असे प्रतिपादन त्यांनी केले.
शहा यांनी शुक्रवारी दोन स्थानी रोड शो केले. ते बारूईपूर (चोवीस परगाणा जिल्हा) आणि आरामबाग (हुगळी जिल्हा) येथील या रोड शोना मोठा प्रतिसाद मिळल्याचे सांगण्यात आले. पक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या दोन टप्प्यांमधील 60 जागांपैकी भाजपला किमान 50 जागा मिळतील असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. मात्र तृणमूल काँगेस आणि काँगेसने या विधानावर नाराजी व्यक्त केली. शहा यांनी कितीही गर्जना केल्या तरी पश्चिम बंगालमध्ये भाजपला हार पत्करावी लागेल, असे प्रतिपादन करण्यात आले.
पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत…
पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत राज्यात नागरीकत्व सुधारणा कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे अमित शहा यांनी एका जाहीर सभेत स्पष्ट केले. या कायद्यामुळे भारताबाहेर राहणाऱया हिंदूंना भारतात भारताचे नागरीकत्व त्वरित मिळणे शक्य होणार आहे. भाजप सत्तेवर आल्यास घुसखोरी संपविली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.