वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये वेगवेगळय़ा जिल्हय़ांमध्ये वीज कोसळून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. हे बळी 3 जिल्हय़ांमध्ये गेले आहेत. दक्षिण बंगालमध्ये सोमवारी अतिवृष्टी झाली आहे. येथील मुर्शिदाबादमध्ये 9, हुगळीत 9 आणि पश्चिम मिदनापूर जिल्हय़ात 2 जणांचा वीज अंगावर पडल्याने मृत्यू झाला आहे.
मुर्शिदाबाद जिल्हय़ात 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. शेतात लोक काम करत असताना विजेच्या कडकडाटासह पाऊस पडू लागला होता. जखमींवर जंगीरपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर बहरामपूर कॉलनीत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे मान्सूनचे वारे दाखल झाल्यानंतर गडगडाटासह पाऊस कोसळू लागला आहे. याचाच फटका राज्याच्या काही भागाला बसला असून ‘यास’ चक्रीवादळानंतर आता पहिल्याच पावसात जीवितहानी झाली आहे. राज्य सरकारने मृतांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.