रस्त्यांवर नौका, सैन्य तैनात ः 5 लाख लोक प्रभावित
वृत्तसंस्था/ हुगळी
पश्चिम बंगालच्या हुगळी, पश्चिम मिदनापूर आणि हावडा या जिल्हय़ांमध्ये पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या जिल्ह्य़ांमधील 200 हून अधिक गावे पूरसंकटाला तोंड देत आहेत. तेथे तीन दिवसांमध्ये 300 मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे आतापर्यंत 16 जणांना जीव गमवावा लागला असून सुमारे 5 लाख लोक प्रभावित झाले आहेत.
घाटल आणि खरड नगरपालिका क्षेत्रात रस्त्यांवर नौका चालविण्याची वेळ आली आहे. शनिवारपासून या भागांमधील वीजपुरवठा ठप्प आहे. भारतीय वायुदलाने 31 लोकांना छतावरून एअरलिफ्ट केले आहे. हुगळीतील बचावकार्यात सैन्याला तैनात करण्यात आले आहे. सैन्याने तेथील अरंगबाग भागातून 20 लोकांना वाचविले आहे.
हुगळीमध्ये रुपनारायण आणि द्वारकेश्वर नद्यांचे पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरले आहे. हुगळीतील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून रस्ते पाण्याखाली बुडाले आहेत. अनेक लोकांनी इमारतींच्या छतावर आश्रय घेतला आहे. तर प्रशासनाकडून मदतसामग्री पाठविण्यात आली आहे. घाटलमधील पोलीस स्थानक, कारागृह आणि प्रशासकीय कार्यालये पाण्यात बुडाली आहेत.
मध्यप्रदेशात पुरामुळे स्थिती बेहाल
5800 लोकांना वाचविले- संकट मोठे असल्याचे मुख्यमंत्र्यांचे विधान
मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर-चंबळ भागात पुरामुळे स्थिती बिघडली आहे. या भागात आतापर्यंत 7 जणांच्या मृत्यूची पुष्टी मिळाली असून 25 जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. श्योपूर, शिवपुरी, भिंड, मुरैना, दतिया, गुना आणि ग्वाल्हेरमध्ये नद्यांच्या काठावर वसलेल्या 1,225 गावांमधून 5,800 लोकांना वाचविण्यात आले आहे.
दतियामधील सेंवढा या नागरी वस्तीला पुराच्या धोक्यामुळे रिकामी करण्यात आले आहे. सुमारे 2 हजार लोक शिवपुरीत अडकून पडल्याची माहिती मंत्री महेंद्रसिंग सिसोदिया यांनी दिली आहे. मंगळवार रात्रीपासूनच सैन्याने बचावकार्यात मोठी भूमिका बजावण्यास प्रारंभ केला आहे.
संकट मोठे असल्याने सैन्याची मदत घेत आहोत असे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी चंबळ क्षेत्राची हवाईपाहणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोनवेळा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत स्थिती जाणून घेतली आहे. मागील 7 दिवसांपासून सतत पडणारा पाऊस आणि धरणांमधून विसर्ग होत असल्याने ग्वाल्हेर-चंबळमधील स्थिती बिघडली आहे.
शिवपुरी, श्योपूर, दतिया आणि ग्वाल्हेर या जिल्हय़ांना सर्वाधिक फटका बसला आहे. शिवपुरीतील 100 हून अधिक गावांना पुराच्या पाण्याचा विळखा बसला आहे. ग्वाल्हेरच्या भितरवार आणि मोहनामध्येही स्थिती खराब आहे.