तृणमूल काँगेस नेत्याच्या हत्येनंतर दंगल, जाळपोळ
@ कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्हय़ातील रामपूरहाट भागात तृणमूल काँगेसच्या एका स्थानिक नेत्याच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलीत 8 जणांना जिवंत जाळण्यात आले आहे. या दंगलीत अनेक घरांना आग लावण्यात आली. एका घरात 8 जण जळून ठार झाले. त्यांची ओळख पटू शकली नाही, असा दावा पोलिसांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणी 72 तासांमध्ये अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. राज्यात मोठा तणाव निर्माण झाला आहे.
या भागातील तृणमूल काँगेस नेता बहादूर शेख याची काही अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती. त्याच्या घरावर बाँब टाकण्यात आले होते. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याचा सूड म्हणून आजूबाजूच्या घरांना दंगलखोर जमावाने आगी लावल्या. हत्या आणि आग प्रकरणात आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच या भागातील सबडिव्हिजनल पोलीस अधिकाऱयाला तसेच सर्कल इन्स्पेक्टरला हटविण्यात आले आहे. हत्या आणि जळीत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास दल बनविण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे डीजीपींनी दिली.
अद्याप माहिती नाही
शेख याची हत्या कोणी केली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. तसेच ज्या व्यक्तींचा जळीतात मृत्यू झाला आहे, त्यांचा या हत्येत सहभाग आहे का, याचीही माहिती मिळालेली नाही. सूडभावनेतून जळीतकांड घडल्याने अनेक निरपराध्यांची वित्त आणि जिवीत हानी झाली आहे, असा आरोप होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी केली जावी, अशी मागणी होत आहे.
राज्यपालांची टीका
या दंगलीमुळे राज्यात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले असून कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी टीका राज्यपालांनी केली. राज्यातील सर्वसामान्य जनता सुरक्षित नाही. राज्य सरकारने या घटनांची गंभीर दखल घ्यावी आणि त्वरित कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
या भीषण जळीतानंतर राज्य भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बॅनर्जीच राज्याच्या गृहविभागाचाही कारभार सांभाळतात. त्यामुळे त्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारुन पदत्याग करावा, असे वक्तव्य राज्य भाजपचे अध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी केले. त्यांनी मंगळवारी तातडीचा दिल्ली दौरा करुन अमित शहा यांची भेट घेतली. संध्याकाळी भाजपने पत्रकार परिषद घेतली. राज्यात लोकशाहीचा उघड खून होत असून राज्य सरकार मूक साक्षीदार बनण्यात धन्यता मानत आहे. राज्यातील हिंसाचारी शक्तींना सत्ताधारी तृणमूल काँगेस पक्षाचे समर्थन आहे. तसेच राज्य सरकारचे अशा शक्तींना संरक्षण असल्यानेच त्या मोकाट सुटल्या आहेत. ताज्या हिंसाचारात महिला आणि मुलांनाही जाळून मारण्यात आले, असा आरोप करण्यात आला.