- 1 कोटी जनतेचे जनजीवन विस्कळित; तर 3 लाख घरांचे नुकसान
ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालमध्ये ‘यास’ चक्रीवादळाचा जोरदार प्रकोप पाहायला मिळाला. याबाबत माहिती देताना बुधवारी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, ‘यास’ चक्रीवादळामुळे राज्यातील जवळपास एक कोटी जनतेचे जीवन विस्कळीत झाले आहे तर 3 लाख घरांचे नुकसान झाले आहे. यासोबतच मासे पकडायला गेलेल्या एका व्यक्तीचा या चक्रीवादळात मृत्यू झाला आहे.
पुढे त्या म्हणाल्या, या चक्रीवादळामुळे समुद्रात उंच लाटा उसळत असून जोराचा वारा आणि पाऊस सुरू आहे आणि अजूनही काही काळ पडत राहील असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. तसेच राज्यातील 15 लाख 4 हजार 506 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी 1 कोटी रुपयांची मदत यावेळी ममता बॅनर्जी यांनी जाहीर केली आहे.
पुढे त्या म्हणाल्या, मी लवकरच पूर्व मोदिनीपुर, दक्षिण 24 परगना आणि उत्तर 24 परगना आदी भागांचा दौरा करणार आहे. या चक्रीवादळात किती नुकसान झाले आहे याबाबत प्राथमिक माहिती मिळाली आहे. पूर्ण माहिती येण्यासाठी साधारण 72 तास लागतील.
दरम्यान, एनडीआरएफच्या टीमकडून अजूनही बचावकार्य सुरू आहे. वादळामुळे उडून गेलेले पत्रे,कोसळलेली झाडे हटवण्याचे काम सुरू आहे.