मुकुल रॉय, राहुल सिन्हांना उमेदवारी, काही ठिकाणी उमदेवारांवरून असंतोष
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली चौथी उमेदवारी सूची घोषित केली आहे. या सूचीत ज्येष्ठ नेते मुकुल रॉय आणि राहुल सिन्हा यांचा समावेश आहे. याशिवाय पार्थो मित्रा व रूद्रनील घोष यांचाही समावेश आहे. भाजपचे वचनपत्र आणि जाहीरनामा येत्या सोमवारी प्रसिद्ध होणार आहे.
मुकुल रॉय यांना कृष्णनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तेथे त्यांची लढाई तृणमूल काँगेसचे कौशानी मुखर्जी यांच्याशी होणार आहे. माजी प्रदेशाध्यक्ष राहुल सिन्हा यांना हाब्रा मतदारसंघ देण्यात आला असून तेथे त्यांचा संघर्ष राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री ज्योतिप्रियो मुलीक यांच्याशी आहे. भाजपचे माजी आमदार शमिक भट्टाचार्य यांना राजरहाट-गोलापूर, राज्य उपाध्यक्ष राजू बॅनर्जी यांना कामारहाटी, तृणमूलमधून भाजपमध्ये आलेले सव्यसाची दत्ता यांना बिधाननगर मददार संघ देण्यात आले आहेत.
याशिवाय, फॅशन डिझायनर अग्निमित्रा पॉल यांना आसनसोलमधून उतरविण्यात आले आहे. तसेच पार्थो मित्रा, लोकनृत्य कलाकार असीम सरकार, माजी फुटबॉलपटू कल्याण चौधरी इत्यादी नावेही घोषित करण्यात आली आहेत.
मृत कार्यकर्त्यांची आठवण
गेल्या 10 वर्षांमध्ये राज्यात साधारणतः 130 कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. त्या तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजपने केला आहे. यापैकी काही मृत कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांनाही भाजपने तिकिटे दिली आहेत. भाजपमध्ये आलेले तृणमूलचे माजी आमदार देबेंद्रनाथ रॉय यांच्या पत्नी चांदीमा यांना तिकीट देण्यात आले आहे. रॉय यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला होता. तसेच गेल्या ऑक्टोबरात मनीष शुक्ला या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती. त्याचे पिता चंद्रमणी यांनाही तिकीट देण्यात आले आहे.
राज्यात एकंदर 294 मतदारसंघ आहेत. यापैकी आतापर्यंत पक्षाने 282 मतदारसंघांमधील उमेदवार घोषित केले आहेत. एक जागा मित्रपक्ष एजेएसयुला सोडण्यात आली आहे. उर्वरित 11 मतदारसंघांमधील उमेदवार लवकरच घोषित होणार आहेत, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.
आठ टप्प्यांमध्ये मतदान
राज्यात मतदानाची प्रक्रिया 27 मार्चपासून सुरू होत आहे. मतदान आठ टप्प्यांमध्ये असून शेवटचा टप्पा 29 एप्रिलला आहे. मतगणना 2 मे ला होणार आहे. या राज्याबरोबरच, आसाम, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि केरळ येथेही विधानसभा निवडणूक होत आहे. तथापि, सर्वांचे लक्ष प्रामुख्याने पश्चिम बंगाल या राज्याकडेच लागले असून नंदीग्राम मतदारसंघ आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.
काही मतदारसंघांमध्ये असंतोष
राज्यातील 13 मतदारसंघांमध्ये उमेदवारांच्या निवडीवरून असंतोष पसरला आहे. यातून माल्दा, जालपायीगुडी, उत्तरग 24 परगाणा, पश्चिम वर्धमान इत्यादी जिल्हय़ांमध्ये कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयांमध्ये तोडफोड केली. पक्षातील निष्ठावंतांवर अन्याय केला जात आहे, असा काही कार्यकर्त्यांचा आरोप आहे. ज्यांनी पक्षासाठी बरीच वर्षे कार्य केले त्यांना डावलून तृणमूलमधून आलेल्या आमदारांना तिकीटे देण्यात आली आहेत, असा आरोप करण्यात येत आहे. यातून काही पदाधिकाऱयांनी पदत्याग केला. तर पांडबेश्वर, जगद्दाल, दुर्गापूर, पूर्बा, जालपाईगुडी आणि हरिश्चंद्रपूर या मतदारसंघांमधील उमेदवार बदलण्याची मागणी होत आहे.