एकंदर 69 मतदारसंघांमध्ये होणार मतदान, नंदीग्रामकडे देशाचे लक्ष
कोलकाता, गुवाहाटी / वृत्तसंस्था
चुरशीने लढविल्या जात असलेल्या पश्चिम बंगाल आणि आसामच्या विधानसभा निवडणुकांमधील मतदाराच्या दुसऱया टप्प्याचा प्रचार मंगळवारी समाप्त झाला आहे. पश्चिम बंगालच्या 30 तर आसामच्या 39 मतदारसंघांमध्ये येत्या गुरूवारी मतदान होत आहे. यांपैकी नंदीग्राम मतदारसंघातील निवडणुकीकडे साऱया देशाचे लक्ष लागून राहिले आहे. तेथे सुवेंदू अधिकारी आणि ममता बॅनर्जी यांच्यात लढत आहे.
आसाममधील मतदानाच्या दुसऱया टप्प्यात प्रामुख्याने नागरीकत्व सुधारणा कायदा हा महत्वाचा मुद्दा आहे. या टप्प्यातील अनेक मतदारसंघांमध्ये बंगाली हिंदूंची संख्या मोठी आहे. त्यांच्यापैकी अनेकजण बांगला देशातून आले आहेत. त्यांच्या दृष्टीने नागरीकत्वाचा मुद्दा सर्वाधिक महत्वाचा मानला गेला आहे.
अमित शहांचे आश्वासन
बांगला देशातून येणारे शरणार्थी आणि घुसखोर यांच्यात भाजपच्या दृष्टीने मोठे अंतर आहे. शरणार्थींना या देशाचे नागरीकत्व देण्यात येईल. मात्र, घुसखोरांची हकालपट्टी करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहे. पठारकांडी आणि सिलचर येथील जाहीर सभांमध्ये त्यांनी नागरीकत्व सुधारणा कायद्याचे समर्थन केले.
पश्चिम बंगालमध्ये तीव्र स्पर्धा
पहिल्या टप्प्याप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये दुसऱया टप्यातही 30 मतदारसंघ आहेत. हे सर्व पूर्वेकडील आणि मध्यभागात आहेत. बव्हंशी मतदारसंघांमध्ये भाजप आणि तृणमूलमध्येच लढत असली तरी किमान तीन मतदारसंघांमध्ये डावे आणि काँगेसची आघाडी कडवी लढत देईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
आकर्षण केंद्र नंदीग्राम
या टप्प्यातील सर्व मतदारसंघांमध्ये पश्चिम बंगालमधील नंदीग्रामकडे देशाचे लक्ष खिळून राहिले आहे. येथे तृणमूल काँगेसमधून भाजपमध्ये आलेले सुवेंदू अधिकारी आणि ममता बॅनर्जी अशी लढत होत असून त्यात कोणाचे पारडे जड ठरणार हे आजतरी निश्चित सांगता येणे कठीण आहे. ममता बॅनर्जी आपला नेहमीचा भवानीपूर मतदारसंघ सोडून नंदीग्राम येथे आल्या आहेत. त्यांचा पराभव करण्याची महत्वाकांक्षा सुवेंदू अधिकारी या एकेकाळी त्यांचाच उजवा हात मानल्या गेलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी बाळगली आहे. त्यामुळे नंदीग्राम आकर्षणाचे केंद्र आहे.