ध्रूवीकरणालाही मर्यादा ः हा मुद्दा भाजपसाठी आसाममध्ये उपयुक्त ठरला. तेथे घुसखोर तसेच सीएए हे मुद्दे प्रचारात सामील राहिले. पण या मुद्दय़ांनी पश्चिम बंगालमध्ये प्रभाव पाडला नाही. ममता बॅनर्जी यांनी स्वतःला बंगालची लेक संबोधून भाजपला राज्याबाहेरील ठरविले. तसेच यादरम्यान त्यांनी मुस्लीम मते एकजूट राखण्यास यश मिळविले.
काँग्रेसची अधोगती ः राष्ट्रीय पातळीवर भाजपला कुठल्याच पक्षाचे आव्हान नसल्याचे या निवडणुकीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. पश्चिम बंगालमधील भाजपच्या पराभवाचा आनंद काँग्रेसला घेता येणार नाही, कारण काँग्रेसला राज्यात खातेही उघडता आले नाही. तर अंतर्गत सुंदोपसुंदीमुळे केरळमधील सत्तेवर येता आलेले नाही.
प्रादेशिक ब्रँड ः लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले असले तरीही राज्याच्या निवडणुकीत प्रादेशिक नेते वर्चस्व राखू शकतात हे यातून दिसून आले. ममता बॅनर्जी, के. चंद्रशेखर राव, जगनमोहन रेड्डी, नवीन पटनायक आणि एम.के. स्टॅलिन या प्रादेशिक नेत्यांनी हे सिद्ध करून दाखविले आहे. तर पिनाराई विजयन यांनी ऐतिहासिक विजय मिळवून काँग्रेसच्या तोंडचा घास पळविला आहे.
उत्तरप्रदेशावर नजर ः 2022 मध्ये होणाऱया उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांना बळ देणारा हा निकाल आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तरप्रदेश या राज्यात सत्तेला गवसणी घालू पाहणाऱया सप आणि बसप यासारख्या प्रादेशिक पक्षांना हा आशेचा किरणच आहे.
कोरोनाचा प्रभाव ः कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेने बंगालमधील अखेरच्या टप्प्यांमधील प्रचाराला प्रभावित केले. कोरोना संकटामुळे होत असलेल्या टीकेमुळे भाजपचे बंगालमधील प्रचारावरील लक्ष विचलित झाले. तसेच पंतप्रधान मोदींच्या रद्द झालेल्या सभांचा भाजपला फटका बसला आहे.
कशाचा लाभ मिळाला?
-तृणमूलने स्वतःचा जनाधार एकजूट ठेवण्यावर भर दिला. तसेच स्वतःचे समर्थक मतदानासाठी बाहेर पडतील हे सुनिश्चित केले. याचबरोबर ममतांचे नेतृत्व जनतेच्या मनात ठासविण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नेत्याचा अभाव असलेल्या भाजपकरता हा मुद्दा नुकसानीचा ठरला.
-काँग्रेस नेते तरुण गोगोई यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीचा भाजपने आसामध्ये लाभ उचलला आहे. सीएएमुळे निर्माण झालेली नाराजी घुसखोरांवर कारवाई केल्याचे सांगत दूर करण्यास भाजपला यश मिळाले आहे.
-केरळमध्ये चांगले प्रशासन, कोरोना संकटातील प्रभावी कामगिरी, शबरीमला मुद्दय़ावरील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न, युडीएफमध्ये मुस्लीम लीग महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची धारणा यातून एलडीएफला लाभ झाला आहे.
-जयललितांचे नसणे अण्णाद्रमुककरता नुकसानीचे ठरले आहे. तर करुणानिधी यांचे खरे वारसदार म्हणून एम.के. स्टॅलिन यांच्या सादर करण्यात आलेल्या नव्या भूमिकेचा द्रमुकला लाभ झाला आहे.
कशामुळे फटका बसला?
-काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी एयुडीएफ तसेच आयएसएफ या पक्षांशी हातमिळवणी करत मुस्लीम मतांचे एकीकरण करण्याचा प्रयत्न केला. भाजपचे प्रति धूवीकरण चालले. तर बंगालमध्ये आयसएफचा कुठलाच प्रभाव दिसून आलेला नाही.
-बंगालमधील महापुरुष आणि जातीय गटांना आपलेसे करण्याचा भाजपचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. तसेच पक्षाच्या सांस्कृतिक आणि राजकीय धोरणांमुळे अनेक मतदारांना पाठिंबा मिळू शकलेला नाही.
-विकासाचे दुहेरी इंजिन असल्याचे बिंबबू पाहणाऱया भाजपला पदरी अपयशच पडले. तर बंगालची लेक असल्याचे सांगणाऱया ममता बॅनर्जी यांना जनतेचा भरघोस पाठिंबा मिळाला.
-केरळमध्ये काँग्रेसने एलडीएफविरोधातील भ्रष्टाचाराचे मुद्दे उपस्थित करत स्वतःला स्वच्छ कारभाराचा पर्याय म्हणून मांडू पाहिले. पण जनतेला हा मुद्दा पटू शकला नाही.