ऑनलाईन टीम / कोलकाता :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
पश्चिम बंगाल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (WBBSE) ने सोमवारी सांगितले की, राज्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन माध्यमिक (दहावी) आणि उच्च माध्यमिक (बारावी) च्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
यापूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले होते की, बारावीची परीक्षा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आणि माध्यमिक म्हणजे दहावीची परीक्षा ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात आयोजित केली जावू शकते. मात्र, आता या दोन्ही परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
सेंट्रल बोर्ड सीबीएससी आणि सीआयएससीआयसह अनेक राज्य बोर्डाकडून परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत आणि विद्यार्थ्यांचे निकाल आंतरिक मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, बंगालमधील कोरोना रुग्णांची संख्या 14,26,132 वर पोहोचली आहे. मागील 24 तासात 7,002 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 104 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर मृतांची एकूण संख्या 16,259 वर पोहचली आहे.