ऑनलाईन टीम / भुवनेश्वर :
पूर्व – मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने निर्माण झालेल्या ‘यास’ चक्रीवादळाने आपला असर दाखवायला सुरुवात केली आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात पोहोचण्यापूर्वीच या भागामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बंगालमधील मोदिनीपूर, बाकुरा, झारग्राम, दक्षिण 24 परगना, कोलकाता आणि नदियानामध्ये तर ओडिशा मधील भुवनेश्वर, चांदीपूर आणि बंगालमधील दिघामध्ये जोराचा पाऊस पडतो आहे. आज काही तासातच यास चक्रीवादळ ओडिशा किनारपट्टीवर धडकणार आहे. याचे परिणाम बंगालपासून बिहार, झारखंड पर्यंत दिसणार आहेत. त्यामुळे बिहार – झारखंडमध्ये अलर्ट जारी करण्यात आले आहे.
- दुपारी ओडिशा किनारपट्टीवर धडकणार
आज म्हणजेच बुधवारी दुपारी 130-140 ताशी वेगाने अतितीव्र ‘यास’ चक्रीवादळ ओडिशा किनारपट्टीवर धडकेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
- दिघामध्ये समुद्राला उधाण
यास चक्रीवादळाचा पश्चिम बंगाल किनारपट्टीच्या जवळ येण्यास सुरुवात झाल्याने पश्चिम बंगालमधील दिघे समुद्राला उधाण आले असून मोठ्या लाटा उसळत असून जोराचा वारा सुरू आहे.
- धामरामध्ये मुसळधार पाऊस
भद्रक जिल्ह्याच्या धामरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यास चक्रीवादळ धामरापासून 60 किमी, पारदीपपासून 90 किमी आणि बंगालमधील दिघापासून 100 किमी दूर अंतरावर पोहचले आहे.
- वाहतुकीवरही चक्रीवादळाचे परिणाम
यास चक्रीवादळाचा परिणाम हवाई आणि रेल्वे वाहतूकीवर देखील झाला आहे. येथील उड्डाणं रद्द करण्यात आली असून, काही रेल्वेगाड्याही वादळामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. तर कोलकाता एअरपोर्ट सकाळी 8.30 वाजल्यापासून रात्री 7.45 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच किनारपट्टी भागातून जवळपास 50 हजारहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.