भाजप सदस्यांच्या घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी आवरले अभिभाषण
कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगाल विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात शुक्रवारी जोरदार हंगामा निदर्शनास आला. राज्यपाल जगदीप धनकर यांच्या अभिभाषणावेळी भाजपच्या सदस्यांनी केलेल्या जोरदार गदारोळामुळे राज्यपालांना आपले भाषण अर्धवट सोडून सभागृहातून बाहेर पडावे लागल्याची घटना घडली आहे. भाजप सदस्यांच्या गदारोळामुळे केवळ पाच मिनिटांमध्ये राज्यपालांना भाषण आवरावे लागले. बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराचा निषेध करीत भाजपच्या सदस्यांनी हा गदारोळ केला. दरम्यान, सभागृहाचे कामकाज तहकूब केल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी पत्रकार परिषद घेत हिंसाचाराच्या वाढत्या घटनांवरून ममता बॅनर्जी सरकारवर तोफ डागली.
पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात गेले तीन वर्षे जोरदार वादंग सुरू आहे. तथापि शुक्रवारी विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या भाषणात भाजपकडूनच गोंधळ घातला गेला. राज्यपालांनी दहा मिनिटे आधीच आपले भाषण थांबवले व ते तेथून बाहेर पडले. विधानसभा सभापती बिमान बॅनर्जी यांनी त्यांना त्यांच्या गाडीपर्यंत सोबत केली.
राज्यपाल आपल्या भाषणात पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर जो हिंसाचार झाला त्याविषयी भाष्य करतील अशी अपेक्षा होती. सरकारने हा विषय राज्यपालांच्या भाषणातून वगळला होता. पण सरकारने जे भाषण दिले आहे तेच भाषण राज्यपाल वाचून दाखवतील अशी अपेक्षा नव्हती. कारण राज्य सरकार जे भाषण देईल तेच भाषण वाचून दाखवण्याचे आपल्यावर घटनात्मक बंधन नाही असे विधान स्वतः राज्यपालांनी अलीकडेच केले होते. त्या पार्श्वभूमीवर अधिवेशनावेळी हंगामा होईल, असा अंदाज सुरुवातीलाच व्यक्त केला जात होता.