बीरभूम हिंसाचारावरून भाजप-तृणमूल आमदारांमध्ये हाणामारी
कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगाल विधानसभेत सोमवारी भाजप आणि तृणमूल आमदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली. बीरभूम हिंसाचार प्रकरणावर भाजपचे आमदार चर्चेची मागणी करत असतानाच दोन्ही बाजूंच्या आमदारांमध्ये बाचाबाची झाली. हा वाद इतका वाढला की, आमदारांनी एकमेकांचे कपडेही फाडले. सभागृहात झालेल्या या गदारोळात तृणमूल काँग्रेसचे आमदार असित मजुमदार जखमी झाले. त्यांना कोलकाता येथील पीजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच सभाध्यक्षांनी सुवेंदू अधिकारी यांच्यासह भाजपच्या 5 आमदारांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले आहे. दुसरीकडे, विधानसभेत झालेल्या हिंसाचारानंतर सोमवारी लोकसभेतही पडसाद उमटले. लोकसभेतील गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते.
विधानसभेत भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी भांडणामध्ये एकमेकांचे कपडेही फाडले. बीरभूम हिंसाचाराच्या मुद्यावर चर्चेची मागणी केल्यावर तृणमूल काँग्रेसचे आमदार आक्रमक झाल्यानंतर भाजप आणि टीएसमी आमदारांमध्ये जोरदार राडा झाला. यादरम्यान भाजप आमदार मनोज तिग्गा यांना मारहाण करण्यात आली. गदारोळानंतर भाजप आमदारांनी सभात्याग केला. या हाणामारीत टीएमसी आमदार असित मजुमदार यांच्या नाकाला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर भाजपच्या पाच आमदारांना निलंबित करण्यात आले असून यामध्ये शुभेंदू अधिकारी, मनोज तिग्गा, शंकर घोष, दीपक बर्मन आणि नरहरी महतो यांचा समावेश आहे.
आमदारांच्या निलंबन कारवाईनंतर भाजप नेत्यांनी विधानसभेबाहेर निदर्शने केली. सभागृहात निषेधादरम्यान सुरक्षा रक्षकांनी आपल्यावर हल्ला केला आणि ढकलल्याचा आरोप भाजप आमदारांनी केला आहे. भाजप आमदारांना धक्काबुक्की करण्यात आली आणि त्यांचे कपडे फाडण्यात आले. बीरभूम हिंसाचार प्रकरणी भाजपने सभागृहात चर्चेची मागणी केली आणि त्यानंतर विरोध सुरू झाला. यानंतर सभागृहातील परिस्थिती बिघडली आणि दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाल्याचे भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी स्पष्ट केले.
भाजपचे टीएमसीवर गंभीर आरोप
बंगाल विधानसभेत गोंधळाची माहिती मिळताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याचे नगरविकास मंत्री फिरहाद हकीम यांना फोन केला. या संपूर्ण घटनेवर मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. त्याचवेळी भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी तृणमूलचे आमदार शौकत मोल्ला आणि इतर महिला आमदारांसह विधानसभेच्या सुरक्षा कर्मचाऱयांनी भाजप आमदारांवर हल्ला केल्याचा आरोप केला.
सभागृहाच्या प्रतिष्ठाची पर्वा नाही ः सभापती
सभागृहात जे घडले ते दुर्दैवी आहे. लोकप्रतिनिधींना सभागृहाच्या प्रति÷sची पर्वा नाही. त्यांना विधानसभेचे महत्त्व कळत नाही आणि विधानसभेत गदारोळ करणे एवढेच त्यांचे उद्दिष्ट आहे, असे बंगाल विधानसभेचे सभापती बिमन बॅनर्जी स्पष्ट करत घडलेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली.