ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगाल सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आंशिक लॉकडाऊनमध्ये 15 जूनपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सरकारने 15 ते 30 मे पर्यंत निर्बंध घातले होते. त्यानंतर आज राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हे निर्बंध 15 जूनपर्यंत वाढवण्याची घोषणा करत लोकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच यावेळी ममता बॅनर्जी यांनी याला लॉकडाऊन म्हणू नका, असे ही सांगितले आहे.
पुढे त्या म्हणाल्या, राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. अर्थ्यव्यवस्थेचे अजून नुकसान होऊ नये म्हणून पूर्ण लॉकडाऊन केले जात नाही आहे. दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 16 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 153 जणांचा मृत्यू झाला.
दरम्यान, राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 13 लाख 18 हजार 203 वर पोहचली असून त्यातील 11,79,999 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आता पर्यंत कोरोनामुळे 14,827 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर सद्य स्थितीत 1 लाख 23 हजार 377 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यासोबतच राज्यातील जवळपास 1.35 कोटी पेक्षा अधिक रुग्णांना लस देण्यात आली आहे.