बहुतांशी रस्त्यांवर एक ते दोन फूट खोल खड्डे ; प्रशासनाचे साफ दुर्लक्ष ; नागरिकांतून तीव्र संताप
आण्णाप्पा पाटील / बहाद्दरवाडी
’खेडय़ाकडे चला’ असा संदेश राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी फार वर्षापूर्वी समाजाला दिला होता. देशाचा खरा विकास हा ग्रामीण भागावरच अवलंबून आहे. म्हणूनच त्यांनी हा संदेश दिला होता. सध्या कोरोना महामारीचे संकट देशात आले असून बहुतांशी लोक पुन्हा एकदा खेडय़ाकडे वळू लागले आहेत. मात्र अजूनही ग्रामीण भाग विकासांपासून वंचित राहिला आहे. तालुक्मयाच्या विविध गावातील संपर्क रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील मुख्य व संपर्क रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे या भागातील रस्ते अक्षरशः खड्डय़ांमध्ये हरवलेले
आहेत.
देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने बाहेरगावी असलेला कामगार वर्ग पुन्हा एकदा आपल्या मूळ गावी परतू लागला आहे. उपजीविकेसाठी बाहेर गावी राहणाऱया कामगारांना वरील धोरणामुळे आता आपल्या गावातच राहण्याची वेळ आली आहे. पूर्वी जसे कच्चे व अर्धवट रस्ते होते तसेच रस्ते सध्याही या नागरिकांना पाहावयास मिळत आहेत. बेळगाव स्मार्ट सिटी होत आहे मात्र ग्रामीण भागातील रस्ते अजूनही खड्डय़ांनी व्यापलेले का ? असा सवालही नागरिकांतून उपस्थित होऊ लागला आहे.
ग्रामीण भागाचा विकास करण्याच्या दृष्टीने प्रशासनामार्फत विविध योजना राबविल्या आहेत. मात्र या योजनांची पूर्तता होते का ? आलेला निधी संबंधित कामासाठीच खर्च होतो का? असे अनेक प्रश्न सध्या तालुक्याच्या पश्चिम भागातील मुख्य व संपर्क रस्त्यांची दुरवस्था पाहिल्यास उपस्थित होऊ लागला आहे. सर्रास या भागातील रस्त्यावर सुमारे एक ते दोन फुटापर्यंत खड्डे पडले आहेत. गेल्या दहा-बारा वर्षांपासून इथली जनता खड्डेमय रस्त्यांशी सामना करीत आहे. निवडणुकीच्या काळात तुमच्या भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करणार अशी केवळ आश्वासनेच लोकांना मिळाली आहेत.
रस्त्यावरील वाहतूक जीवघेणी
दैनंदिन रस्ते खड्डय़ात हरवून गेले आहेत. या रस्त्यावरून वाहतूक करणे जीवघेणी ठरत आहे. अशी परिस्थिती असताना सरकार मार्फत विविध विकास कामांसाठी व बायपास रस्त्यांसाठी शेतकऱयांच्या सुपीक जमिनी हडप करण्याचा घाट सरकार चालवत असते. आधी नागरिकांना रोजच्या वहीवाटीच्या रस्त्यांची सोय करून द्यावी अशी प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे.
पश्चिम भागातील कर्ले ते बेळवट्टी हा संपर्क रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे .गेल्या दोन वर्षात झालेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यावर भले मोठे भगदाड पडले आहे .सध्या या रस्त्यावरून वाहतूक करणे म्हणजे जीव मुठीत घेऊनच प्रवास करावे लागत आहे. गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी या भागातील नागरिकांतून होऊ लागल्या आहेत.
दोन वर्षात मुसळधार पाऊस झाला. यावेळी पावसाचे पाणी पूर्णपणे रस्त्यावर आले होते. यामुळे रस्त्यावरील काही भाग पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेला व रस्त्याच्या चार ते पाच ठिकाणी मोठे भगदाड पडले. सध्या या रस्त्यावरून मोठी वाहने जाणे अवघड बनले आहे तसेच रात्रीच्या वेळी हा रस्ता धोकादायक
आहे.
कर्ले-बेळवट्टी रस्ता वाहून जाण्याची शक्यता
कर्ले ते बेळवट्टी सुमारे पाच किलोमीटरचा संपर्क रस्ता असून हा रस्ता कर्ले ,बेळवट्टी, बिजगर्णी, कावळेवडी, बडस या भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचा संपर्क रस्ता आहे. या रस्त्यांवरून वाहनांसह शेतकऱयांचीही वर्दळ असते. पण, सध्याची रस्त्याची परिस्थिती पाहता येणाऱया पावसाळय़ात हा रस्ता पूर्णपणे वाहून जाण्याची शक्मयता वर्तवली जात आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागातील बेळगुंदी -राकसकोप रस्त्यावर खड्डे अन धूळ मातीचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्याकडे प्रशासनाचे अनेक वर्षापासून दुर्लक्ष झाले आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी या रस्त्याच्या कामकाजाचा शुभारंभ झाला आहे. मात्र अद्यापही रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.
या रस्त्यावर अनेक अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत तरीदेखील प्रशासनाला जाग येत नाही आहे. रस्त्यावरील खड्डय़ांमुळे किरकोळ अपघात तर नेहमी ठरलेलेच असतात.
बेळगुंदी, बोकनूर, सोनोली, यळेबल, राकस्कोप ,बिजगर्णी, बेळवट्टी आदी भागातील नागरिकांसाठी हा महत्त्वाचा रस्ता असून पश्चिम भागातील अनेक गावांना जोडणारा हा रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर वाहनधारकांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ सुरू असते. परिसरातील नागरिक व वाहनधारकांसाठी हा महत्त्वाचा रस्ता असूनही सध्या हा रस्ता दुरुस्तीच्या अपेक्षित आहे
नव्याने डांबरीकरण तरीपण रस्त्यावर खड्डे
खादरवाडी येथील रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले आहे तरीदेखील या रस्त्यावर खड्डे पडू लागले आहेत.
बेळगाव पणजी महामार्गावरील खादरवाडी क्रॉस पासून ते रस्त्यावर दोन ते तीन ठिकाणी भलेमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्डय़ांमध्ये सध्या पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनधारकांना ये-जा करताना बरीच कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी या खड्डय़ांचा अंदाज येत नसल्यामुळे किरकोळ अपघाताच्या घटनाही घडू लागल्या आहेत. या रस्त्यावरून अवजड वाहनांची वर्दळ सुरू असल्यामुळे हे खड्डे पडू लागले आहेत अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
कर्ले गावातर्फे खासदार मंगला अंगडींना निवेदन देणार-नरसिंग देसाई
बेळवट्टी-कर्ले रस्ता हा गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित झाला आहे. सध्या या रस्त्यावर मोठे भगदाड पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधींना आम्ही वारंवार सांगूनही याकडे दुर्लक्ष झाले आहे. बेळगाव लोकसभा पोट निवडणूक नुकतीच झाली असून नवनिर्वाचित खासदार मंगला अंगडी यांच्याकडे आम्ही कर्ले गावच्याच्यावतीने रीतसर निवेदन देऊन या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी करणार आहोत.
अर्धवट रस्त्याच्या दुरुस्तीची गरज-कृष्णा पाटील
नावगे गावाला हुंचेनहट्टी ते नावगे असा एक रस्ता येतो. तर दुसरा बेळगाव जांबोटी रोडवरील नावगे क्रॉस येथून एक रस्ता येतो. त्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे मात्र कुट्टलवाडीनजीक रस्त्याच्या काही भागाचे डांबरीकरण अद्याप केलेलेच नाही. या ठिकाणी सरकारी धान्याचे गोडाऊन असून नेहमी अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते अर्धवट राहिलेल्या रस्त्याच्या दुरुस्ती करण्याची गरज आहे
रस्त्याची पाहणी करून दुरुस्तीचे काम त्वरित हाती घ्या-अरुण मोटणकर
बेळगुंदी रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने दुर्लक्ष का केले आहे हेच आम्हाला समजत नाही. लोकप्रतिनिधी याकडे कानाडोळा करीत आहेत तर आम्ही दाद कुणाकडे मागायची ?सध्या हा रस्ता धूळ मातीने व्यापलेला आहे या रस्त्यावरून ये-जा करणे आम्हाला अवघड झाले आहे संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी या रस्त्याची पाहणी करून दुरुस्तीचे काम त्वरित हाती घ्यावे.