प्रतिनिधी/ बेळगाव
मागील चार दिवसांपासून बेकिनकेरे व परिसरात भात रोप लागवडीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. पावसाने दडी मारल्याने भात रोप लागवडीत अडथळा निर्माण होत असून दमदार पावसाची गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत. शिवारात म्हणावे तसे पाणी साचून राहिले नसल्याने रोप लागवड करताना अडचणी निर्माण होत आहेत.
पश्चिम भागातील उचगाव, तुरमुरी, कल्लेहोळ, बाची, कोनेवाडी, बसुर्ते, अतिवाड, बेकिनकेरे, बेळगुंदी, बिजगर्णी, कावळेवाडी, सुळगा, बेनकनहळ्ळी, सोनोली, कुदेमनी आदी भागात रोप लागवडीला प्रारंभ झाला आहे. रोप लागवडीसाठी पावसाची नितांत गरज असते. शिवाय शिवारात चिखलदेखील करावा लागतो. त्यामुळे शेतकरी पॉवर ट्रिलर व बैलजोडीच्या साहाय्याने चिखल करताना दिसत आहेत. मात्र, सुरळीत रोप लागवडीसाठी दमदार पावसाची गरज आहे.
तालुक्मयात विहिरी, कूपनलिकेची सोय असलेल्या ठिकाणी तुरळक प्रमाणात रोप लागवडीचे काम हाती घेण्यात आले आहे. शिवाय नदी काठावरील शिवारातही रोप लागवडीला प्रारंभ झाला आहे. शेतकरी पंपसेटद्वारे पाणी सोडून रोप लागवड करत आहेत. दमदार पावसाला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे रोप लागवडीचे काम जोमात सुरू होणार आहे.