मुंबई/प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेकडून २ ऑगस्टपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानाच्या अधिक माहितीसाठी आयएमडीच्या मुंबई आणि नागपूर वेधशाळेच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन के.एस. होसाळीकर यांनी केलं आहे.
हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी हा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये पुणे, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, आणि सातारा या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ठाण्यात आज आणि उद्या तर मुंबईत उद्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. तर रायगड आणि रत्नागिरीमध्ये पुढचे चार दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यात पुढचे तीन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज
रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळं पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हवामान विभागाने पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासह पुराच्या फटक्यातून सावरत असलेल्या जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने २ ऑगस्टपर्यंतची पावसाची माहिती दिली असून, यात रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह इतर काही जिल्ह्यांना इशारा देण्यात आला आहे.