प्रतिनिधी/ बेंगळूर
केंद्र सरकारच्या मार्गसूचीनुसार राज्य सरकारनेही लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता आणली आहे. राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतरत्र पहाटे 5 ते रात्री 9 पर्यंत उद्याने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. राज्य सरकारचे मुख्य सचिव टी. एम. विजयभास्कर यांनी शनिवारी याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला आहे.
सरकारने यापूर्वी लॉकडाऊन शिथिल करताना उद्याने सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 4 ते 7 या कालावधीत सुरू ठेवण्याची मुभा दिली होती. आता हा कालावधी वाढविण्यात आला आहे. मात्र, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना दिवसातील कोणत्या वेळेत उद्याने सुरू ठेवावीत, याबाबतचा अधिकार देण्यात आला आहे.
लॉकडाऊन वाढविताना 30 मे रोजी केंदीय गृह सचिवालयाने कंटेनमेंट झोन वगळता इतरत्र अनलॉक 1.0 जारी केला होता. त्यानुसार टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्याच्या दिशेने पावले उचलली होती. मात्र, कोरोना नियंत्रणासाठी केंद्र आणि राज्य सरकारने सुरक्षा मार्गसूचींचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, असे आदेशात नमूद करण्यात आले होते.