डॉ. शेखर साळकर यांची माहिती, : दोन महिन्यातील संसर्गाचा घेतला आढावा
प्रतिनिधी /पणजी
कोरोना व्यवस्थापन करणाऱया डॉक्टर्सच्या तज्ञ समितीने पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग शाळा प्रत्यक्ष हजेरीत सुरु करण्यास हिरवाकंदील दर्शवला असून तशी शिफारस राज्य सरकारला केली आहे. प्रथम ही शिफारस सरकारच्या कोरोना कृती दलाकडे (टास्क फोर्स) जाणार असून तेथे मान्यता मिळाल्यानंतर ती सरकारदरबारी पोहोचणार आहे. आता सरकारला अर्थात शिक्षण खात्याला या शिफारशीवर काय तो अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे.
डॉक्टर्सच्या तज्ञ समितीचे प्रमुख सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी वरील माहिती देऊन सांगितले की, गेल्या दोन महिन्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. नववी ते अकरावीचे वर्गही यापूर्वी सुरू झाले आहेत. त्याचाही विचार करण्यात आला. गणेश चतुर्थीनंतर तसेच गेल्या दोन महिन्यात आणि नववी अकरावी शाळा सुरू झाल्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढलेला नाही, उलट तो कमी होत गेला असून आता त्याचा दरही 1 टक्क्यापेक्षाही कमी झाला आहे. गेल्या एक दोन महिन्याच्या काळात मुलांना या कोरोनाची बाधा झालेली नाही. तसेच शालेय मुलांना हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे दाखल करण्याची पाळी आलेली नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून तज्ञ समितीने शाळा सुरू करण्यास एकमताने संमती दर्शवल्याचे डॉ. साळकर यांनी नमूद केले.
केंद्र सरकारच्या संमतीनेच मुलांचे लसीकरण
दरम्यान, 18 वर्षावरील मुलांचे कोरोना लसीकरण सुरू करण्याबाबत केंद्र सरकारच्या संमतीची राज्य सरकार वाट पहात असून ती मिळताच मुलांचे लसीकरण चालू होणार आहे, अशी माहिती डॉक्टर्सच्या बैठकीतून देण्यात आली. नववी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू केल्यानंतर कोरोनाचे कोणतेही परिणाम दिसून आलेले नाहीत, असे निरीक्षण बैठकीत नोंदवण्यात आले आहे.
कोरोनाचे नियम पाळावेत
पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करताना कोरोनाचे नियम पाळावे लागतील, असेही समितीने बजावले आहे. सर्व वर्ग एकाचवेळी सुरू केल्यास मुलांची गर्दी होणार असल्याने ती टाळण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने काही उपाययोजना आखणे आवश्यक असल्याचे समितीने सूचित केले आहे.
आता निर्णय सरकारच्या कोर्टात
पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा टप्याटप्याने सुरु कराव्यात आणि मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर पाळणे हे मात्र बंधनकारक ठेवणे असे समितीचे म्हणणे आहे. शिक्षण खाते व सरकारने त्याबाबत योग्य ते उपाययोजावेत आणि शाळा व्यवस्थापानाने संपूर्ण काळजी घेऊन सावधानता बाळगणे महत्त्वाचे आहे, असेही समितीचे म्हणणे आहे. शाळा सुरु करण्याचा विषय आता सरकारच्या कोर्टात असून ती जबाबदारी सरकारवर आली आहे. सध्या दिवाळीची सुटी नुकतीच संपुष्टात आली असून पुढील डिसेंबर महिन्यात नाताळाची सुटी पडणार आहे. तेव्हा आता नवीन वर्ष 2022 मध्येच शाळा सुरु होतील, असा अंदाज आहे.