प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात 2021-22 सालातील शैक्षणिक वर्ष 1 जुलैपासून सुरू होणार आहे. त्यानुसार पहिली ते दहावी विद्यार्थ्यांसाठी चंदन वाहिनीवरून दररोज व्हिडीओद्वारे धडे प्रसारित होणार आहेत. 1 जुलैपासून दररोज सकाळी 8 ते सायंकाळी 4 पर्यंत व्हिडीओ धडय़ांचे प्रसारण करण्यात येणार आहे. मुख्याध्यापकांना इयत्तानिहाय वेळापत्रक पाठविण्यात आले असून 1 जुलैपासून 30 दिवस सेतूबंध कार्यक्रम होणार आहे. पहिल्यांदा विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा घेतली जाणार असून त्यानंतर ए, बी आणि सी ग्रेड देऊन विद्यार्थ्यांचे विभाजन केले जाणार आहे.
पहिली, दुसरी आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांचा रविवारी सकाळी 10.30 ते 12 आणि दुपारी 1.30 ते 2 यावेळेत अभ्यास घेतला जाणार आहे. चौथीच्या विद्यार्थ्यांना शनिवारी सकाळी 10 ते 11 आणि रविवारी सकाळी 10 ते 11 पर्यंत प्रथम भाषा, परिसर अध्ययन आणि गणित विषयांचे अध्यापन केले जाणार आहे. पाचवीच्या विद्यार्थ्यांना शनिवारी सकाळी 9 ते 10 व रविवारी सकाळी 9 ते 10 पर्यंत प्रथम भाषा, गणित व परिसर अध्ययन विषयांचे अध्यापन करण्यात येणार जाणार आहे.
सहावीतील विद्यार्थ्यांना गुरुवारी सकाळी 10.30 ते दुपारी 2 पर्यंत इंग्रजी, गणित, हिंदी, विज्ञान, समाज विषयांचे अध्यापन केले जाणार आहे. त्याचबरोबर सातवी विद्यार्थ्यांना गुरुवारी सकाळी 9 ते 10.30 पर्यंत आणि शुक्रवारी 9 ते 10.30 पर्यंत इंग्रजी, गणित, प्रथम भाषा, विज्ञान, समाज आणि हिंदी विषयांचे अध्यापन केले जाणार आहे.