प्रतिनिधी/कोल्हापूर
भारतात पहिला हिंदकेसरीचा किताब जिंकून कुस्ती इतिहासात प्रतिष्ठा मिळविलेले मल्ल श्रीपती खंचनाळे (वय 86) यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती बिघडली असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू हाेते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वार्ताने महाराष्ट्रासह देशभरातील कुस्ती क्षेत्रात शोककळा पसरली.
हिंदकेसरीचा किताब मिळविण्यासाठी त्यांनी अपार मेहनत केली होती. 1959 साली दिल्ली येथे हिंदकेसरी किताबासाठी खंचनाळे यांची रूस्तम-ए-पंजाब बत्तासिंग यांच्यासोबत लढत झाली होती. वैशिष्ठÎ म्हणजे लालमातीत रंगलेली ही लढत सलग दोन दिवस चालली. पहिल्या दिवशी दोघात दीड तास कुस्ती होऊनही कोणी चितपट झाले नव्हते. त्यामुळे कुस्ती शौकिनांच्या आग्रहाखातर दुसऱया दिवशी परत लढत लावली. यात मात्र खंचनाळे यांनी बत्तासिंगला आस्मान दाखवून हिंदकेसरीच्या गदेवर कब्जा केला होता. बक्षीस वितरण समारंभात देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते खंचनाळे यांना प्रतिष्ठेची गदा देऊन गौरविले होते. कराडच्या मैदानात झालेल्या या लढतीवर केवळ 2 मिनिटाच कब्जा घेऊन मल्ल शिरगावकर यांना पराभूत करत 1960 साली महाराष्ट्र चॅम्पियन झाले.
देशात हिंदकेसरीचा किताब पटकावणाऱया मल्लांकडे नेहमीच आदराने पाहिले जाते. कुस्ती क्षेत्राच्या आजवरच्या इतिहासात कोल्हापूरसह महाराष्ट्रातील 8 तगड्या मल्लांनी प्रतिष्ठेची हिंदकेसरीची गदा पटकावली आहे. यातही साऱया देशात हिंदकेसरीची गदा जिंकण्याच्या पहिला मान पहिला श्रीपती खंचनाळे या सीमाभागातील मराठी मल्लाने खेचून आणला याचा समस्त मराठी बांधवांना आज अभिमान वाटतो. वयाच्या 7 व्या वर्षी त्यांनी स्वीकारलेला कुस्तीपेशा वयाच्या 45 व्या वर्षी त्यांनी थांबवला.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेले एकसंबा (ता. चिकोडी, बेळगाव) हे खंचनाळे यांचे मुळगाव. त्यांचा जन्म 10 डिसेंबर 1934 रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. 1948 सालापर्यंत त्यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण मराठी शाळेतून घेतले. मात्र शाळेत शिकत असल्यापासूनच ते कुस्ती स्पर्धांमध्ये ते भाग घ्यायचे. वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षीच त्यांनी पैलवान होण्याचा निर्धार केला हाेता.