मलेशियातील कौस्तूभ ढवळेला रत्नागिरीची ओढ
तन्मय दाते / रत्नागिरी
zदरवर्षीची मे महिन्यात रत्नागिरीची वारी ठरलेली… मात्र यंदा कोरोनामुळे त्यावर पाणी पडले आहे. आई काही दिवस दुबईला बहिणीकडे गेली आणि तीही तिथेच अडकून पडली. या कठीण प्रसंगात रत्नागिरीत सर्व एकत्र असतो तर किती बरे झाले असते असे पदोपदी जाणवत राहत. मात्र, मलेशियन सरकारच्या चोख नियोजनामुळे कोठेही असुरक्षीततेची भावना जाणवत नसल्याचे मुळ रत्नागिरीचा व सध्या मलेशियातील कौलालंपूर येथे वास्तव्यास असलेला कौस्तुभ ढवळे सांगतो.
s विप्रो कंपनीत टेक्निकल-लीड ह्या हुद्यावर कौस्तुभ कार्यरत असून रत्नागिरीचीच पत्नी क्षिती आणि 6 वर्षाच्या क्रीशासमवेत वर्षभरापासून मलेशियात कुटुंब वास्तव्यास आहे. कोरोनाने घातलेल्या थैमानाच्या पार्श्वभुमीवर दोघंही घरूनच काम करत आहेत.
अन्य देशांप्रमाणे मलेशियामधेही कोरोनाचा प्रसार मोठय़ा प्रमाणावर असून मलेशियन सरकारने उचललेल्या नियोजनबद्ध पावलांमुळे तो बराच नियंत्रित आहे. आतापर्यंत साडेपाचहजाराच्या घरात केसेस सापडल्या असून सव्वातीन हजारांहून अधिक कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. आजपर्यंत 89 जणांना जीव गमवावा लागला आहे. 18 मार्च पासूनच हालचाली नियंत्रण आदेश (Movement Control Order) लागू करण्यात आला आहे. जीवनावश्यक गोष्टी जसे भाज्या, फळे, दूध आणि धान्य ह्या सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत, काही घरपोच सेवा देखील चालू आहेत.
मलेशियन सरकारची काटेकोर अंमलबजावणी
मलेशियन सरकारने कोविड-19 रिलीफ मदत निधीसाठी 67 बीलियन डॉलर्सपेक्षा जास्त घोषित केले आहेत. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात (18 मार्च- 31 मार्च) केवळ अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यात आल्या. दुसऱया टप्प्यात (1 एप्रिल – 14 एप्रिल ) कडक कारवाई केली गेली आणि कायदे मोडणाऱया लोकांवर जास्त दंड लागू केला गेला. सार्वजनिक वाहतूकही प्रतिबंधित करण्यात आली. सध्या सुरु असलेल्या तिसऱया टप्प्यात (15 एप्रिल – 28 एप्रिल) प्रभावित भागात योग्य ते क्रिनिंग करण्यास भाग पाडले जात आहे. काही भाग जिथे जास्त केसेस आढळल्या ते सील करण्यात आले. 20 एप्रिलला पहिल्यांदाच मलेशिया एकही मृत्यू आढळला नाही. दुसऱया टप्प्यानंतर येथील लोक नियमांचे पालन करत आहेत आणि सामाजिक अंतर राखत आहेत. मिलिटरीदेखील येथील पोलीस दलाला साथ देण्यासाठी कार्यरत आहे. काही सुपरमार्केट आणि दुकानांमध्ये केवळ 5-50 सदस्यांनाच तेही क्रिनिंग करूनच प्रवेश मिळत आहे. प्रवेश करताना प्रत्येक व्यक्तीचे तापमान तपासले जात असल्याचे तो सांगतो.
पर्यटन, मिश्र नागरिकांमुळे कोरोना मलेशियात
मलेशियामध्ये राहणारे नागरिक मिश्र म्हणजे विविध देशांमधून आलेले आहेत. असे विभिन्न देशातले नागरिक आणि पर्यटक ह्यामुळे काही केसेस वाढू लागल्या. चिनी, इंडोनेशियन, थायलँड, कोरियन नागरिक मोठय़ा संख्येने मलेशियामध्ये कामाच्या, व्यवसायाच्या उद्देशाने राहत आहेत. एकूणच 15 मार्च नंतर जास्त केसेस वाढू लागल्या.
सर्वच क्षेत्रांचे मोठे नुकसान
भारताने देखील कोविड-19 पहिल्या टप्प्यात असतानाच खूप चांगले निर्णय घेतले. अन्यथा अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असती. मोदी सरकारने कोविड-19 शी लढण्यासाठी चांगले निर्णय आणि उपाययोजना केल्या आहेत. सर्व क्षेत्रातील अर्थव्यवस्थेचे आणि व्यवसायाचे नुकसान झाले आहे परंतु कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कठोर कारवाई करण्याची गरज आहे आणि भारत सरकार चांगली कारवाई करीत आहे.