बारावी परीक्षेला चोख बंदोबस्तात सुरुवात
प्रतिनिधी /बेळगाव
बारावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. हिजाबबंदीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पहिल्या दिवशी बिझनेस स्टडी व तर्कशास्त्र पेपर पार पडला. विद्यार्थ्यांना कॉलेजचा गणवेश परीक्षेसाठी सक्तीचा करण्यात आला आहे. त्यामुळे कुठेही वादाचा प्रसंग न होता पहिला पेपर सुरळीतपणे पार पडला. परंतु पहिल्याच पेपरला बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 350 विद्यार्थी गैरहजर होते.
हिजाबबंदीवरून कर्नाटकातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामध्ये शिक्षण विभाग भरडला जावू नये, यासाठी राज्य सरकारकडून कडक अंमलबजावणी केली जात आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी पदवीपूर्व विभागाने हिजाबबंदी करत कॉलेजचा गणवेश सक्तीचा केला आहे. यामुळे परीक्षा केंद्रांमध्ये दाखल होणाऱया विद्यार्थिनी जरी हिजाब घालून आल्या असल्या तरी हिजाब बदलण्यासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था करण्यात आली होती.
परीक्षा केंद्रात दाखल होताच विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंग केली जात होती. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी केली जात होती. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात एकूण 42 केंद्रांवर बारावीची परीक्षा सुरू आहे. यावर्षी 20 हजार 817 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. पहिल्याच दिवशी 350 विद्यार्थ्यांनी दांडी मारली.
परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर
परीक्षा केंद्रांवर होणारी कॉपी टाळण्यासाठी शिक्षण विभागाने सीसीटीव्ही बसविले आहेत. यामुळे परीक्षेदरम्यान होणाऱया गैरप्रकारांना आळा बसला. बेळगाव जिल्हय़ातील 90 परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. याचबरोबर भरारी पथकेही परीक्षा केंद्रांवर दाखल होऊन परीक्षेची माहिती घेत होती.