बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाची माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रथम टप्प्यात 71 मतदारसंघांमध्ये संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 53.46 टक्के मतदान झाल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. मात्र ही आकडेवारी प्राथमिक अंदाजानुसार असून अंतिम टक्केवारी यापेक्षा जास्त असू शकते, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र मतदान शांततेने पार पडले. कोरोना विषाणूचे संकट अद्याप असूनही मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे आयोगाने मतदारांचे आभार मानले आहेत.
मतदानाची वेळ संपल्यानंतरही अनेक मतदान केंद्रांसमोर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. संध्याकाळी सात वाजता अनेक ठिकाणी मतदान संपले. या 71 मतदारसंघांपैकी 50 हून अधिक मतदारसंघ नक्षल प्रभावी भागांमध्ये होते. तेथे विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवली होती.
सरासरीत अंतर नाही…
2010 च्या विधानसभा निवडणुकीत एकंदर मतदान साधारणतः 53 टक्के झाले होते. तर 2020 च्या विधानसभा निवडणुकीत ते 57 टक्के होते. यावेळीही पहिल्या टप्प्यात मतदानाने एवढी सरासरी गाठली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या राज्यात 55 टक्के मतदान झाले होते. यावेळी कोरोनाचा संसर्ग असल्याने मतदान कमी होईल, अशी अटकळ होती. तथापि, मतदारांनी कोरोनावरही मात करून मतदानात मोठय़ा प्रमाणात भाग घेतल्याचे दिसून आले.