ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशात सोमवारी १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले. पहिल्याच दिवशी ४१ लाख मुलांनी लस घेतली. मध्य प्रदेशात सर्वाधिक ७.५ लाख मुलांना डोस मिळाला. देशात एकाच दिवसात ४१ लाख मुलांना लस मिळणे यासाठी महत्त्वाचे आहे की, या वयोगटात देशात फक्त ७.४ कोटी मुले आहेत. म्हणजे रोज याच वेगाने लसीकरण झाले तर केवळ १८ दिवसांत या वयाेगटातील सर्व मुलांचा पहिला डोस पूर्ण होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पहिल्याच दिवशी मुलांच्या लसीकरणासाठी त्यांचे पालक अभिनंदनास पात्र आहेत. राज्यांत किशोरांच्या संख्येच्या हिशेबाने पाहिल्यास हिमाचल प्रदेशात पहिल्याच दिवशी २० टक्के मुलांना सिंगल डोस मिळाला.
दरम्यान, देशात ३ जानेवारीपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू झालेल्या १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी सर्वच राज्यांमध्ये मुलांनी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र दिसून येत होते. सोमवारी रात्री ८.३० वाजेपर्यंत ४० लाखांहून अधिक मुलांना लसीचा पहिला डोस मिळाल्याचे आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले. त्यानंतरही हा आकडा पुढे वाढत जात होता. दिवसभरात लाभलेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ‘वेल डन यंग इंडिया !’ असे ट्विट करत आनंद व्यक्त केला. दरम्यान, लसीसाठी नोंदणी करणाऱयांची संख्या ५१ लाखांच्या पुढे गेली आहे.