कोरोना परिस्थितीचा परिणाम : पाच मंत्री बाधित, 60-70 आमदार होम क्वारंटाईन
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना परिस्थितीच्या सावटाखाली सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील 80 हून अधिक आमदार अनुपस्थित होते. पाच मंत्री कोरोनाबाधित आहेत. तर 60 ते 70 आमदार होम क्वारंटाईनमध्ये असल्याने ते अधिवेशनात सहभागी झालेले नाहीत. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे अधिवेशन शनिवारपर्यंत घेण्यात येणार आहे.
कोरोना परिस्थितीमुळे सर्व आमदार, मंत्र्यांना अधिवेशनापूर्वी कोरोना चाचणीची सक्ती करण्यात आली होती. अहवाल निगेटिव्ह आलेल्यांनाच अधिवेशनात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. अनेक आमदारांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर काही आमदार होम क्वारंटाईनमध्ये आहेत. यापूर्वी उपचार घेऊन बरे झालेले अनेक जण 14 दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यामुळे सोमवारी 80 पेक्षा जास्त जण अधिवेशनामध्ये सहभागी झाले नाहीत. कोरोना परिस्थितीमुळे सर्वसामान्यांना विधानसौधमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. आमदार, मंत्र्यांसाठी देखील अनेक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शनिवारपर्यंत विधानसभा आणि विधानपरिषदेत आमदारांची उपस्थिती कमीच राहणार आहे.
अधिवेशनाला प्रारंभ होताच विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी शोकप्रस्ताव मांडला. यावेळी मुख्यमंत्री येडियुराप्पा, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, निजद नेते बंडेप्पा काशेमपूर आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी अलिकडेच निधन झालेल्या मान्यवरांचे गुणगाण केले. आमदार बी. सत्यनारायण, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, राज्यसभा सदस्य अशोक गस्ती, माजी केंद्रीय मंत्री राज मदनगोपाल नायक, जी. रामकृष्ण, साहित्यिक निसार अहमद, संगीतकार पं. जसराज, तसेच गलवान खोऱयात हुतात्मा झालेल्या जवानांना आदींना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज काही वेळ पुढे ढकलण्यात आले.
प्रत्येक अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार एकमेकांची भेट घेऊन तब्येतीविषयी विचारपूस करतात. हस्तांदोलन करून एकमेकांशी आपुलकीने चौकशी करतात. मात्र, या अधिवेशनात तसे चित्र दिसून आले नाही. दुरुनच ‘नमस्कार’ करत. हातवारे करून सांकेतिकपणे विचारपूस केली. कोराना परिस्थितीमुळे सभागृहात कोणीही एकमेकांच्या जवळ गेले नाहीत. कर्नाटक विधिमंडळाच्या इतिहासात प्रथमच इतक्या प्रमाणात सुरक्षा उपाययोजना करण्यात आली. आमदारांची थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझरचा वापर झाला. काही आमदार फेस शिल्ड घालून कामकाजात सहभागी झाले.
आमदारांच्या आसनासमोर काचेचे सुरक्षा आवरण बसविण्यात आले आहे. प्रत्येकाला मास्कची सक्ती करण्यात आली आहे. पत्रकार आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींना विधानसभेच्या दुसऱया मजल्यावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंत्र्यांचे स्वीय साहाय्यक, गनमॅनना विधानसौधमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. मात्र, आमदारांचे स्वीय साहाय्यक आणि गनमॅनना विधानसौधमध्ये प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यांच्यासाठी विधानसौधच्या सभागृहात बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सहा दिवसांत अधिवेशन गुंडाळणार
सोमवारपासून सुरू झालेले राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन लवकर गुंडाळण्यात येणार आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे 10 दिवसांऐवजी केवळ 6 दिवस अधिवेशन चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिवेशनाला प्रारंभ होण्यापूर्वी सकाळी विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळ कामकाज सल्ला समितीची बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीवेळी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे अधिवेशन 10 दिवस चालविणे कठीण असल्याने सरकारने केवळ 3 दिवस म्हणजेच बुधवारपर्यंत अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यामुळे विरोधी पक्षाच्या आमदारांची सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले. 30 हून अधिक विधेयकांवर कोणत्याही प्रकारे चर्चा न करता थेट मंजुरी मिळविणे उचित नाही. राज्यात कोरोना परिस्थिती, पूर-अतिवृष्टी यासह अनेक ज्वलंत समस्या आहेत. या विषयांवर चर्चा व्हायलाच हवी, अशी जोरदार मागणी बैठकीत केली.
तत्पूर्वी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्याशी चर्चा करून अधिवेशनाचे कामकाज तीन दिवसात आटोपण्यास संमती सुचविण्याची विनंती केली. मात्र, सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी नकार दिला. शेवटी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी समझोत्याने या मुद्दय़ावर तोडगा काढून शनिवारपर्यंत अधिवेशन घेण्यास संमती दर्शविली.