विद्यार्थी, वयोवृद्धांना करावी लागते कसरत : अधिकाऱयांनी दखल घ्यावी
प्रतिनिधी / बेळगाव
क्लोजडाऊन काळात तरी पहिल्या रेल्वेगेटजवळील बॅरिकेड्स हटवावेत, अशी मागणी होत आहे. गेल्या सात वर्षांपासून या रेल्वे गेटजवळ बॅरिकेड्स घातल्याने वाहनधारकांना पूर्ण लांबचा वळसा घालून यावे लागत आहे. पहिले रेल्वेगेट जवळील रस्ता अडविला व दुसऱया रेल्वेगेटजवळील रस्ता खुला आहे.
वास्तविक पहाता पहिल्या रेल्वेगेटजवळील रस्ता हा शहापूर, वडगाव ते मंडोळीरोडपर्यंत सोयीचा ठरतो. मात्र सध्या शहापूर, वडगाव येथून टिळकवाडीला जावयाचे असल्यास पहिल्या रेल्वेगेटजवळून वळसा घालून जावे लागते किंवा दुसऱया रेल्वेगेटकडून जावे लागते. येथे पादचाऱयांना जाण्यासाठीसुद्धा जागा ठेवण्यात आलेली नाही. येथून सायकलही जावू शकत नाही. इतकेच नव्हे तर गुराख्यांना गायी, म्हशी घेवून जाताना मोठी कसरत करावी लागते. पादचारी वळसा घालण्याचे टाळण्यासाठी अरुंद अशा जागेतून अलिकडून पलिकडे जातात. तर विद्यार्थीसुद्धा अनेकदा सायकलसह हा अरुंद रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात. क्लोजडाऊनमध्ये वेळ कमी असल्याने महिलांना भाजीमार्केटमध्ये जाऊन भाजी आणावयाची असल्यास रस्ता ओलांडणे कठीण होते व वळसा घालून यावे लागते.
चारचाकी वाहनांसाठी हा रस्ता बंद केल्यास काही हरकत नाही. परंतु दुचाकी, सायकलस्वार व पादचाऱयांसाठी येथे किमान काही अंतराचा रस्ता खुला करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुभाष घोलप यांनी सातत्याने सात वर्षे हा प्रश्न लावून धरला आहे. पोलीस, प्रशासन सर्वांकडे त्यांनी तक्रारी केल्या आहेत. प्रशासनाने रस्ता खुला करावा, अशी सूचना करताच दोन ते तीन दिवसांसाठी एखादे बॅरिकेड्स हटविले जाते व पुन्हा परिस्थिती जैसे थे असते. सध्या तरी काही दिवसांपूरता हा रस्ता खुला करावा, अशी मागणी होत आहे.