ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशभरात कोरोना विषाणू पसरवण्यास काँग्रेस जबाबदार आहे. महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडून त्यांना मोफत तिकीटं दिली, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसदेत केला. या आरोपाला खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत महाराष्ट्रापेक्षा गुजरातमधून जास्त ट्रेन चालवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मोदींचे हे वक्तव्य धक्कादायक असून, ते महाराष्ट्राचा अपमान करणारे आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
सुळे म्हणाल्या, पंतप्रधान मोदींच्या दीड तासांच्या भाषणाकडे खूप अपेक्षेने मी पाहत होते. कारण कोरोनाच्या महामारीतून आपण बाहेर पडत आहोत. राज्ये अडचणीत आहेत, कोविडच्या तिसरी लाट ओरसत आहे, चीनचा महत्त्वाचा मुद्दा आहे, नवीन नोकऱ्या निर्माण होत नाहीत. असे असतानाच मोदी महाराष्ट्राबद्दल जे बोलले त्याने मला वैयक्तिक वेदना झाल्या आहेत. राज्याने भाजपाला 18 खासदार निवडून दिले आहेत आणि मोदी पंतप्रधान असण्यामागे महाराष्ट्रातील मतदारांचाही मोठा वाटा आहे. त्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान पंतप्रधान मोदींनी कोविड सुपर स्प्रेडर म्हणून केला आहे, हे खूप धक्कादायक आहे.
महाराष्ट्राने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडले आणि मोफत तिकीटं देऊन कोरोना देशभर पसरवला असे वक्तव्य करणाऱ्या पंतप्रधानांनी हे लक्षात घ्यावं की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत गुजरात राज्यामधून 1033, महाराष्ट्रातून 817 आणि पंजाबमधून 400 ट्रेन कोरोनाकाळात चालवण्यात आल्या ट्रेन महाराष्ट्र सरकार नाही तर केंद्र सरकार चालवते. आमच्याकडे ट्रेन नाही आम्ही एसटी देऊ शकतो.