एकाही चेंडूचा खेळ न होता पहिली टी-20 रद्द, संघ-प्रेक्षकांची निराशा, दुसरा सामना उद्या
वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
भारत व न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ न होता रद्द करण्यात आला. त्यामुळे चाहत्यांची घोर निराशा झाली. दुसरा सामना रविवारी माऊंट माँगनुइ येथील बे ओव्हलवर होणार आहे.
मुसळधार पावसामुळे मैदानात पाणी साचल्याने ते खेळण्यायोग्य नव्हते. काही वेळासाठी पाऊस थांबला होता. पण पुन्हा सुरू झाल्यानंतर सामना होणार नाही हे स्पष्ट झाले. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी सातच्या सुमारास हा सामना ठरलेल्या वेळेत सुरू होण्याची 90 टक्के शक्यता वाटत होती. पण हळूहळू पावसाचा जोर वाढू लागल्यानंतर स्थानिक वेळेनुसार रात्री 8.52 वाजता सामना रद्द केल्याची घोषणा पंचांना करावी लागली. 9.46 पर्यंत प्रतीक्षा करण्याची शेवटची वेळ होती. यावेळी खेळ सुरू झाला असता तर प्रत्येकी पाच षटकांचा सामना घेतला जाणार होता. पण त्याआधीच सामना होणार नसल्याचे जाहीर करण्यात आले.
तीन सामन्यांच्या या मालिकेतील आणखी दोन सामने होणार असून त्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. दोन्ही संघ ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाले होते. ती निराशा झटकून टाकत नवी सुरुवात करण्यास दोन्ही संघ उत्सुक झाले होते. पण पावसामुळे त्यांच्यासह प्रेक्षकांचीही निराशा झाली. विश्वचषक स्पर्धेत भारताला नंतर विजेत्या ठरलेल्या इंग्लंडकडून तर न्यूझीलंडला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
नियमित कर्णधार रोहित शर्मासह अन्य काही खेळाडूंना या मालिकेत विश्रांती देण्यात आली असल्यामुळे या संघाचे नेतृत्व अष्टपैलू हार्दिक पंडय़ा करीत आहे तर रिषभ पंतकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ‘आम्ही सर्वच जण खेळण्यास खूप उत्सुक झालो होतो. न्यूझीलंडमध्ये खेळणे कोणालाही आवडेल, असा हा सुंदर देश आहे. पण दुर्दैवाने आजचा सामना होऊ शकला नाही. या सामन्यासाठी लोकांनीही बऱयापैकी गर्दी केली होती. त्यामुळे आम्हीही उत्साहित झालो होते. पण व्यावसायिक खेळाडूंना अशा गोष्टींना सामोरे जाणे आवश्यक असते. जे घडले ते स्वीकारण्यावाचून पर्याय नसतो,’ असे याविषयी बोलताना हार्दिक म्हणाला.
वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली असल्याने शुबमन गिल, उमरान मलिक, इशान किशन, संजू सॅमसन यासारख्या युवा खेळाडूंना या मालिकेत संधी देण्यात आली आहे. तसेच प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह संपूर्ण कोचिंग स्टाफलाही विश्रांती देण्यात आली असून द्रविड यांच्या गैरहजेरीत व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे ती जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या मालिकेतील तिसरा टी-20 सामना मॅक्लीन पार्क नेपियर येथे येत्या मंगळवारी होईल. त्यानंतर 25 नोव्हेंबरपासून वनडे मालिकेला सुरुवात होईल.