प्रतिनिधी / बेळगाव
एकीकडे होत असलेला पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या जातात. मात्र, दुसरीकडे याच उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येते. वंटमुरी येथील शेवटच्या बस स्टॉपजवळील साई मंदिरानजीक पाण्याची पाईप फुटल्यामुळे पाणी रोज वाया जात आहे.
येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने त्यांच्या सोयीसाठी चोवीस तास पाण्याची व्यवस्था वंटमुरी येथे करण्यात आली आहे. मात्र, येथील चोवीस तास पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने रोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांनी याबाबत तक्रार केली असून अद्यापही येथील गळती निवारण्याकडे पाणीपुरवठा मंडळाने दुर्लक्ष केले असल्याचे पाहायला मिळत आहे. पाणीपुरवठा मंडळाने ताबडतोब या ठिकाणी लक्ष देऊन फुटलेल्या पाईपची लवकरात लवकर दुरुस्ती करावी व पाण्याचा होत असलेला अपव्यय टाळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.