प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात करंजे परिसरात बुद्ध विहार येथील रस्त्यावर एका जेसीबीकडून पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याचे स्थानिकांनी सांगितले. ही पाईपलाईन दुरुस्ती करण्यासाठी पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्याना याची माहिती दिली. परंतु प्राधिकरणाकडून सुट्टीचा वार असल्याने साधे फोनही उचलण्याचे कष्ट घेतले नाही. त्यामुळे दुपारी उशिरापर्यंत पाणी वायाच जात होते.
शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी जाते. ही जलवाहिनी करंजे भागाला पाईपलाईन जाते. त्याच पाईपलाईनला दुपारी एका जेसीबीचा दात लागल्याने जलवाहिनी फुटली गेली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जावू लागले. त्याची माहिती नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला दिली. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची शासकीय सुट्टी असल्याने आज त्यांनी फोनसुद्धा घेण्याची तसदी घेतली नाही. तरीही पाणी पुरवठयाच्या सभापती सीता हादगे यांनी पाईपलाईनला गळती लागल्याचे अभियंत्यांना फोनवरुन कळवले. दुपारी उशिरापर्यत गळती काढण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कर्मचारी आले नव्हते. तोपर्यंत नागरिकांनी आपली वाहने धुऊन घेण्याचे काम केले. अनेकांनी उडणाऱया कारंजाचा आनंद घेतला.